Showing posts with label धर्म. Show all posts
Showing posts with label धर्म. Show all posts

धर्मास ग्लानी का येते?

"मिलिंदाने असा प्रश्न विचारला की धर्मास ग्लानी का येते? नागसेनाने त्याचे उत्तर देऊन त्याची तीन कारणे सांगितली-
पहिले कारण हे की एखादा धर्मच कच्चा असतो. त्या धर्माच्या मूळ तत्त्वांत गांभीर्य नसते. तो कालिक धर्म बनतो व काळापुरता अशा धर्म टिकतो.

दुसरे कारण हे की धर्म प्रचार करणारे विद्वान लोक नसतील तर धर्म ग्लानी होते. ज्ञानी माणसांनी धर्मज्ञान सांगितले पाहिजे. विरोधकांशी वादविवाद करण्यास धर्माचे प्रचारक सिद्ध नसतील तर धर्माला ग्लानी येते.

आणि तिसरे कारण हे की धर्म व धर्माची तत्त्वे विद्वानांसाठी असतात. प्राकृत व सामान्य लोकांकरिता मंदिरे-देवळे असतात. ते तेथे जाऊन आपल्या श्रेष्ठ विभूतीचे पूजन करतात.

आपण बौद्ध धर्म स्विकारतांना ही कारणे लक्षात ठेवली पाहिजे. बौद्ध धर्माची तत्त्वे कालिक, काही काळापुरती आहेत असे कोणासही म्हणता यावयाचे नाही. आज अडीच हजार वर्षांनंतरही बुद्धांची सारी तत्त्वे सर्व जग मानते. अमेरिकेमध्ये बुद्धाच्या दोन हजार संस्था आहेत. इंग्लंडमध्ये तीन लाख रुपये खर्च करून बौद्ध मंदिर बांधण्यात आले आहे. जर्मनीतही तीन-चार हजार बुद्ध संस्था आहेत. बुद्धाची तत्वे अजरामर आहेत. तथापि बुद्धांनी असा दावा केला नाही की हा धर्म ईश्वराचा आहे. बुद्धांनी सांगितले माझे वडील प्राकृत होते; माझी आई प्राकृत बाई होती. हा धर्म तुम्हाला वाटेल तर घ्यावा. हा धर्म जेव्हा तुमच्या बुद्धीला पटेल तेव्हा तो तुम्ही स्वीकारा. एवढी उदारता दुसऱ्या कोणत्याही धर्मात सांगितलेली नाही." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.

दि. १५ ऑक्टोबर १९५६, नागपूर. धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यातील भाषणातून.

बौद्ध धर्म पुन्हा या देशाचा धर्म होईल

"बुद्ध या देशात 80 वर्षे जगला. या देशात त्याने आपल्या आयुष्याची 45 वर्षे प्रचारात घालविली. आज जशी शंकराचार्याला मोटार आहे तशी त्याच्याजवळ मोटार नव्हती. साधा गाडीघोडाही नव्हता. वाहतुकीचे एकही साधन त्याला उपलब्ध नव्हते. तरीपण देश-कल्याणाकरिता तो जम्मुपासून कन्याकुमारीपर्यंत अक्षरशः पाणी फिरला. बाराशे वर्षांपर्यंत बुद्धधर्म या देशात चालू होता. ज्याने भिक्षा मागून आपले जीवन जगविले, अनंत हाल सोसले, त्याचे नावही या देशात निघत नाही.
केव्हा केव्हा खोट्याचा जय होतो, खर्‍याचा जय होत नाही. तसाच काहीसा हा प्रकार आहे. पण सर्वांनी ध्यानात ठेवावे की सत्याचाही केव्हातरी जय होईलच. आणि आज ती वेळ आली आहे. बाराशे वर्षांचा धर्म पुनरपि या देशाचा धर्म होईल, अशी माझी खात्री आहे." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.

दि. १४ जानेवारी १९५१, वरळी, मुंबई येथील बुद्धदूत सोसायटीच्या विद्यमाने भरविण्यात आलेल्या बुद्धमेळ्यात केलेल्या भाषणातून.

जाती मोडण्यासाठी बौद्ध धर्माचा स्वीकार हाच एक उपाय

"धर्म शुद्ध तत्त्वावर आधारित असला पाहिजे. बुद्धाचा वर्णाश्रम पद्धतीवर कधीच विश्वास नव्हता. 'आपण सर्व सारखेच आहोत' ही गोष्ट आपण कधीच विसरता कामा नये. माणसा-माणसात कसलाच भेदभाव नाही. जन्माने उच्च नीच कोणीच असू शकत नाही. उच्चनीचता करणीने प्राप्त होते. या गोष्टी बुद्धाने सांगितल्या आहेत. जर लोक पुन्हा बुद्धाचा अंगीकार करतील तर हा देश पुन्हा वैभवाप्रत गेल्यावाचून राहणार नाही. एरव्ही दुसऱ्या कोणत्याही मार्गाने जातीभेद जाणे शक्य नाही. परंतु खरोखरच कोणाला जाती मोडायच्या असतील तर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करावा; हाच एक उपाय आहे." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
 
दि. २० मे १९५१, नवी दिल्ली येथे बुद्ध जयंतीला केलेल्या भाषणातून.

बौद्ध धर्माचा भारतातील प्रादुर्भाव व फ्रान्सची राज्यक्रांती या महत्त्वाच्या घटना

"बौद्ध धर्माचा भारतातील प्रादुर्भाव व फ्रान्समधील राज्यक्रांती या दोन्ही युगांतकारी महत्त्वपूर्ण घटना आहेत. बौद्ध धर्माच्या उदयापूर्वी एखादा शूद्र राजा होऊ शकेल ही कल्पनाही करता येण्यासारखी नव्हती. परंतु भारतीय इतिहासाच्या तज्ञांना हे माहीत आहे की बौद्ध धर्माच्या प्रादुर्भावानंतर शूद्रांनाही सिंहासनावर बसण्याची संधी प्राप्त झाली आणि देशात सामाजिक समतेची स्थिती निर्माण झाली. गणतंत्रीय राज्यपद्धती ही बौद्ध काळाचीच देणगी आहे. भगवान बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर इ. पू. २७४ पर्यंत बौद्ध धर्माची स्थिती कशी होती हे जाणून घेण्याची पर्याप्त साधने उपलब्ध नाहीत. तथापि अशोकाच्या काळात बौद्ध धर्माचा प्रसार विजेच्या गतीने झाला. अशोक आणि चंद्रगुप्तासारखे बलाढ्य सम्राट बौद्ध काळातच झाले आहेत व यांनीच भारताबाहेरील राज्यांशी मैत्रीचे संबंध स्थापित केले होते. बौद्ध काळात भारतामध्ये स्थापत्यकला, चित्रकला, मूर्तीकला, इत्यादी नाना प्रकारच्या कलांचा विकास झाला. बौद्ध काळात साहित्य आणि तत्त्वज्ञानाची इतकी भरभराट झाली होती की अनेक देशांतील विद्यार्थी येथील नालंदा व तक्षशिला विश्वविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी दाखल झाले. त्यापूर्वी कधीही असा गौरव भारताला प्राप्त झाला नव्हता." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
 
दि. ६ जून १९५०, कोलंबो येथे वाय. एम. बी. ए. कोलंबो द्वारा आयोजित 'विश्व बौद्ध भ्रातृत्व सम्मेलनात' केलेल्या भाषणातून.

तत्त्व आणि व्यवहाराची सांगड घालण्याची जबाबदारी

"स्वातंत्र्य, समता व भ्रातृभाव यांच्या आपण खूप गप्पा मारतो. नव्हे, या त्रयीवर आपण व्याखानेही झोडू शकतो. परंतु या तिन्हीपैकी एकतरी आपल्या भारतीय समाजात बसत आहे की नाही याचा विचारही आपण करीत नाही. जणू काही तत्त्वांची आणि व्यवहाराची सांगड घालण्याची आपणावर काहीच जबाबदारी नसल्याचे वाटते.
 
भारतामध्ये बहुसंख्य जनता अज्ञान आणि भोळसर खुळ्या कल्पनेत गुरफटून गेली आहे. नव्हे, येथील समाजरचनाच खुळ्या कल्पनांना जन्म देते. म्हणून उपास-तापास, नवस-सायास, देव-देवऋषी करणे म्हणजे धर्म पालन करणे अशी लोकांची भावना झालेली आहे. या खुळ्या आणि धर्मभोळ्या जनतेची या कल्पनेतून सुटका करावयास पाहिजे. विद्यार्थ्यांनी चाळी-चाळीत जाऊन जनतेचे अज्ञान आणि खुळ्या समजुती दूर केल्या पाहिजेत. तरच आपल्या शिक्षणाचा जनतेला काहीतरी लाभ होईल. आपण आपल्या ज्ञानाचा केवळ परीक्षा पास करण्यासाठी उपयोग करून चालणार नाही. ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या बांधवांची सुधारणा व प्रगती करण्याकरिता केला पाहिजे. तरच भारत उन्नतावस्थेला जाईल.

जगातील अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सुटलेले नाहीत. ते सोडविण्याचा मानव सारखा प्रयत्न करीत आहे. त्यासाठीच निरनिराळे सिद्धांत पुढे मांडण्यात येतात. कार्ल मार्क्स आज आपणापुढे खरा प्रश्न आहे. आजचे प्रश्न सोडविण्यास मार्क्सच्या विचारसरणीऐवजी दुसरी एखादी प्रभावी विचारसरणी उपयोगी पडेल काय? हाच आजच्या काळाचा प्रश्न आहे. आपले सारे प्रश्न सोडविण्यास कार्ल मार्क्सचे सिद्धांत समर्थ ठरतील की नाही हीच आजची समस्या आहे. ही समस्या आजच्या पिढीने शक्य तितक्या लवकर सोडविली पाहिजे." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
 
दि. २ मे १९५४, सिद्धार्थ कॉलेज, मुंबई येथील यूथ असेंब्लीच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणातून 
**********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)

धर्माच्या नावावर जमविलेल्या पैशाचा विनियोग

"धर्माच्या बाबतीत आपण चुकीच्या मार्गाने गेलो आहोत, एवढेच नव्हे तर आजकालच्या काळात धर्माच्या नावावर पैसा गोळा करून तो अनिष्ट बाबींवर खर्च केला जातो. आज जगात दारिद्र्य आणि दुःख असताना अशारितीने धर्माच्या नावावर पैसा जमवून तो ब्राम्हणादि आणि उत्सवावर खर्च करणे हा एक भयंकर गुन्हा आहे. गौतम बुद्धांनी हा प्रश्न व्यवस्थितपणे हाताळला होता. त्यांनी आपल्या नैतिक शास्त्रात पंचशील, अष्टांग मार्ग आणि निर्वाण फार उत्कृष्ट रीतीने सांगितले आहेत. याशिवाय त्यांनी आपल्या अनुयायांना खालील दहा तत्त्वे आत्मसात करण्यास सांगितली आहेत. ती अशी: (१) प्रज्ञा, (२) शील, (३) नेखम्म, (४) दान, (५) वीर्य, (६) खन्ति, (७) सच्च, (८) अधित्थान, (९) मैत्री, (१०) उपेक्खा.

ज्यामुळे अज्ञानांधकार नाहीसा होतो ती प्रज्ञा म्हणजे ज्ञानरूपी प्रकाश; शील म्हणजे नैतिक विचार; कोणतीही वाईट गोष्ट करू नये, परंतु चांगली गोष्ट मात्र सतत करीत राहावे. नेखम्म म्हणजे ऐहिक सुखापासून अलिप्त राहणे. दान म्हणजे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता दुसऱ्यासाठी तन-मन-धन अर्पण करणे. वीर्य म्हणजे धैर्य, कसोटी की ज्यामुळे हाती घेतलेल्या कामात कधी माघार न घेणे. खन्ति म्हणजे सहनशीलता. द्वेषाला द्वेषाला उत्तर न देणे. सच्च म्हणजे सत्य. प्रत्येकाने खोटे कधी बोलू नये. सत्य बोलावे. जे बोलावे ते सत्यच असावे. अधित्थान
म्हणजे मनोनिग्रह. मैत्री म्हणजे प्रेम. मग ती मित्राविषयी असो किंवा शत्रूविषयी असो. मानवाविषयी असो किंवा इतर प्राणीमात्राविषयी असो. उपेख्खा म्हणजे उपेक्षा, ज्यामुळे मन सुखदुःखाच्या पलीकडे गेले असून कोणत्याही परिणामाने विचलित न होता कर्तव्यपरायण राहणे. वरीलपैकी जास्तीत जास्त गुण प्रत्येक माणसाने आत्मसात करावे अशी बुद्धाची अपेक्षा होती. म्हणूनच पाली वाङ्मयात असे म्हटले आहे की गौतम बुद्धांनी वरीलप्रमाणे "दान पारमिता" जरी शिकविली असली तरी दान हे सत्पात्री असण्याबद्दल त्यांचा कटाक्ष होताच. देण्यासाठी दाता जरी प्रवृत्त झाला तरी त्यामुळे ज्याला दान दिले जाते त्याला मात्र त्याने कमीपणा येता कामा नये. पददलितांना एक दिवस स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सामर्थ्य निर्माण करणारी शक्ती जिला आपण मदत म्हणतो तेच खरे दान. साधुसंतांच्या नावावर पैसा जमा केला असेल तर त्याचा पारमिता मध्ये सांगितलेल्या तत्त्वाप्रमाणे विनियोग करणे अत्यंत आवश्यक आहे. दारिद्र्य, अज्ञान, रोगराई इतकी आहे की सध्याच्या काळात ती नष्ट करण्यासाठी असा पैसा खर्च न करता तो धनिकांसाठी खर्च करणे म्हणजे दुष्टपणा ठरेल. त्या पैशाचा विनियोग रुग्णालये, शिक्षण, बेकारांसाठी छोटे छोटे धंदे, गरीब व अनाथ महिलांसाठी काहीतरी धंदे-शिक्षण देणे, अशा कार्यावर त्यांनी करावा. आपण जर जमा केलेल्या पैशाचा विनियोग अशा रीतीने केला तर त्यामुळे आपल्या कार्याची वाहवा होईल." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
दि. २४ जानेवारी १९५४, झेवियर कॉलेजचे मैदान, अखिल भारतीय साई भक्त संमेलन

मी एक बौद्ध धर्माचा उपासक आहे

"मी एक बौद्ध धर्माचा उपासक आहे. मी नुसताच बोध घेतलेला नाही व नुसते बोलतो असे नाही, तर प्रत्यक्ष कृती करून दाखवीन. माझे आयुष्याचे शेवटचे दिवस आता बुद्ध धर्माच्या प्रचारातच खर्च करण्याचे मी निश्चित ठरविले आहे. मी हे बुद्ध धर्म प्रचाराचे शेत पेरणार आहे व त्यात कोणते पीक येते हे पाहणार आहे." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
दि. २७ मे १९५३, बुद्ध जयंती, नरे पार्क, परेल.

धर्माची आवश्यकता गरिबांना आहे

"धर्माची आवश्यकता गरिबांना आहे. पीडित लोकांना धर्माची आवश्यकता आहे. गरीब मनुष्य जगतो तो आशेवर. जीवनाचे मूळ आशेत आहे. आशाच नष्ट झाली तर जीवन कसे होईल? धर्म आशादायी बनवितो व पीडितांना, गरिबांना संदेश देतो: "काही घाबरू नकोस. होईल, जीवन आशादायी होईल." म्हणून गरीब व पीडित मनुष्यमात्र धर्माला चिकटून राहतो ." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
दि. १५ ऑक्टोबर १९५६, दीक्षाभूमी नागपूर येथील दीक्षामंडपातील ऐतिहासिक भाषणातून.

मनुष्याच्या मनुष्यत्वाला व माणुसकीला किंमत नाही तो धर्म काय कामाचा?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या "मुक्ती कोन पथे?" या ऐतिहासिक भाषणातून (13 ऑक्टोबर 1935, येवले, महाराष्ट्र)

"या असमानतेच्या अन्यायात सांत्वन करण्याच्या हेतूने काही स्पृश्य लोक अस्पृश्यांना सांगतात की तुम्ही शिक्षण घ्या, म्हणजे तुम्हाला शिवू! तुम्ही स्वच्छ रहा म्हणजे तुम्हाला शिवू! आणि समानतेने वागवू! खरे म्हटले असता, अडाणी महाराची, दरिद्री महाराची आणि अस्वच्छ महाराची जी गत होते तीच गत शिकलेल्या महाराची, पैसेवाल्या महारची आणि स्वच्छ राहणार्‍या महाराची होते. हे तुम्हा आम्हा सर्वांना अनुभवाने माहीत आहे. पण तो प्रश्न जरी बाजूला ठेवला तरी जर शिक्षण घेतल्याशिवाय, हाती पैसा असल्याशिवाय, अंगावर पोषाख असल्याशिवाय मानमान्यता मिळणार नाही, तर साध्या महाराने काय करावे? ज्याला शिक्षण प्राप्त होऊ शकत नाही, ज्याला पैसा मिळू शकत नाही आणि ज्याला नीटनेटका पोषाख करता येत नाही, त्या महाराला समानता कशी मिळणार? ख्रिस्ती धर्मात, मुसलमानी धर्मात जी समानतेची शिकवण देण्यात आली आहे तिचा संबंध विद्या, धन, पोषाख, पराक्रम अशा बाह्य वस्तूंशी मुळीच नाही. माणसाचे मनुष्यत्व हीच महत्त्वाची गोष्ट आहे, असे दोन्ही धर्म मानतात आणि ते मनुष्यत्व सर्वांना आदरणीय असले पाहिजे. कोणी कोणाचा अवमान करु नये व कोणी कोणाला असमान मानू नये, असे ते धर्म शिकवतात. हिंदू धर्मात या शिकवणीचा पूर्ण अभाव आहे. ज्या धर्मात मनुष्याच्या मनुष्यत्वाला व त्याच्या माणुसकीला काही किंमत नाही तो धर्म काय कामाचा? आणि त्याला कवटाळून धरून राहण्यात काय हशील आहे?" ~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

(खंड 18, भाग 1)

गरीब पीडितांना दुःखातून मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य

गरीब पीडितांना दुःखातून मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य आहे ~डॉ. बी. आर. आंबेडकर
*******************************
"बौद्ध धर्माचा मूळ पाया काय आहे? इतर धर्मात व बौद्ध धर्मात फरक आहे. इतर धर्मात बदल हा घडून यावयाचा नाही, कारण मनुष्य व ईश्वर यांचा संबंध ते धर्म सांगतात. इतर धर्मांचे म्हणणे असे की ईश्वराने सृष्टी निर्माण केली. ईश्वराने आकाश, वायू, चंद्र, सूर्य सर्व काही निर्माण केले. आम्हाला ईश्वराने काहीही करावयाचे शिल्लक ठेवले नाही, म्हणून ईश्वरास भजावे! ख्रिस्ती धर्माप्रमाणे तर निर्णयाचा एक दिवस (Day of Judgement) असतो व त्या निर्णयाप्रमाणे सर्व काही घडते. देव व आत्मा यांना बौद्ध धर्मात जागा नाही. भगवान बुद्धांनी सांगितले, जगात सर्वत्र दुःख आहे; 90% माणसे दुःखाने पिडलेली आहेत. त्या दुःखातून पिडलेल्या गरीब माणसांना मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य आहे."  ~डॉ. बी. आर. आंबेडकर

धर्माची तपासणी करता आली पाहिजे


प्रत्येकाला धर्माची परीक्षा करून त्याची तपासणी करता आली पाहिजे. बाजारात सराफाच्या दुकानात आपण सोन्याचा दागिना खरेदीसाठी जातो. तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही हे पाहता की, हे सोने खरे आहे की खोटे? हे समजण्यासाठी कसोटीवर त्या दागिन्याला कस लावून पाहण्यात येतो. तसेच धर्माला कस लावून त्याची परीक्षा पाहिली पाहिजे. धर्मतत्त्वांची छाननी करून, सिद्धांत आणि आचार पडताळून आपण पाहूया की कोणता धर्म माणसाला सुखसमाधान देऊ शकेल?
~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर. २३ जून, १९५६, दिल्ली.

विद्या ही अन्नासारखी सर्व मनुष्यास आवश्यक आहे

"बौद्धधर्माशी संलग्न झालेले 'मिलिंद' हे नाव महाविद्यालयास देण्याचे दुसरे कारण असे की, विद्या ही अन्नासारखी सर्व मनुष्यास आवश्यक आहे. प्रत्येकाला तिचा लाभ झाला पाहिजे; हा उदार विचार पहिल्यांदा उद्घोषित केला असेल तर तो भगवान बुद्धांनीच. तेव्हा ज्या असंख्य लोकांना कैक शतके अज्ञानात दडपून ठेवण्यात आले त्यांना सुविद्य बनविण्याचा प्रारंभ करताना बुद्धाचे अथवा त्याच्या शिष्याचे नाव आठवावे हे स्वाभाविकच आहे."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर. १२ डिसेंबर, १९५५. 

मनुष्याने स्वार्थच करीत न राहता परार्थही केला पाहिजे

मनुष्याने स्वार्थच करीत न राहता परार्थही केला पाहिजे ~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
********************************************
"मनुष्याने स्वार्थच करीत न राहता थोडाफार परार्थही केला पाहिजे. यासाठीच धर्माची जरुरी आहे. तुमच्यासाठी हे सर्व मी करीत आहे. मला हे धर्माने शिकविले. नुसते पोट भरले म्हणजे सर्व काही झाले असे समजू नका. "कबीर कहे कुछ उद्दम कीजे। आप खाये और औरनको दीजे।" या कबीराच्या दोह्याप्रमाणे उद्योग करा, आपण खा व दुसऱ्यांनाही द्या. स्वार्थ व परार्थ दोन्ही साधा. घर प्रथम सांभाळा. मात्र समाजकार्यालाही मदत करा."


************

३ जून १९५३
************
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)
***********************************

अपुरे विद्यार्जन उपयोगाचे नाही

अपुरे विद्यार्जन उपयोगाचे नाही ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर
********************************************
हैद्राबादच्या मुक्कामात दि. १४ नोव्हेंबर १९५४ रोजी संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'शेड्युल्ड कास्ट ट्रस्ट फंड' तर्फे संचालित होस्टेलला भेट दिली. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या प्रचंड मेळाव्यापुढे केलेले भाषण:
********************************************
"ज्या लोकांनी ही बोर्डींग काढली आहेत, त्यांचे आभार मानले पाहिजेत. त्याचबरोबर हैद्राबाद सरकारचेही आभार मानणे जरूर आहे. लोक आपणास नावे ठेवतील अशाप्रकारचे वर्तन विद्यार्थ्यांनी ठेवू नये. त्यांना मिळालेल्या या संधीचा वेळीच योग्य फायदा करून घेतला पाहिजे. माझ्यावेळची परिस्थिती फारच कठीण होती. आमची दहा बाय दहाची एक खोली होती. तीत सामान, कुटुंबातील दहा माणसे, एक बकरी व दोन पैशाच्या तेलाची एक चिमणी इतका परिवार होता. अशा परिस्थितीत मला अभ्यास करावा लागला आहे. मी फार अभ्यास केला असल्यामुळे लोक मला भितात. दुसऱ्यांनी वर्षभर प्रयत्न करूनही जे काम होत नाही ते मी दोन मिनिटात करतो (टाळ्या). याचे कारण मी फारच शिकलो आहे. तसेच तुम्हीही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अपुरे विद्यार्जन करून काही उपयोगाचे नाही. परीक्षा कोणीही पास होतो. नुसत्या परीक्षा पास होऊन पदव्या मिळविण्यात काही अर्थ नाही. विद्यार्थ्यांनी रचनात्मक कार्य करून दाखविले पाहिजे. दगड फोडीचे काम करण्यात व कारकून बनण्यात काहीच फरक नाही.
या देशात ब्राह्मण समाजाची अशी समजूत होती की, विद्या फक्त आम्हीच प्राप्त करु शकतो. परंतु हे साफ खोटे आहे. कोणा एका युरोपियनाने म्हटले आहे की जगात सहा विद्वान आहेत. त्यापैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक होत. (टाळ्या). विद्या ही एक तलवार आहे. या तलवारीने कोणीे कोणाची मान कापतो, तर शीलवान मनुष्य तरवारीने कुणाचे रक्षण करतो. त्यासाठी धर्मशील बनले पाहिजे. रोज सकाळ-संध्याकाळ सामुदायिक वंदना करून बौद्धतत्त्वाची उपासना केली पाहिजे. दर आठवड्याला वादविवादात्मक विषय ठेवून कोणालातरी बोलावून त्यावर व्याख्याने करविली पाहिजेत. तुम्हाला जगात कसे राहावे हे शिकविले जात आहे. तेव्हा, सुट्टीत घरी गेल्यावर आरोग्य व स्वच्छता याविषयी आई-वडिलांना माहिती सांगून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सध्या तुमच्या बोर्डींगला जी आर्थिक मदत मिळत आहे, ती तळ्यातील पाण्याप्रमाणे आहे. ती केव्हाना केव्हा आटणार हे निश्चित. यासाठी सरकारने कायम स्वरूपाच्या मदतीची सोय केली पाहिजे."
~डॉ. बाबासाहेब आंबेडकर

#बाबासाहेब  #आंबेडकर
************
जनता: २० नोव्हेंबर १९५४
************
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)
***********************************

सत्य शोधण्याच्या कामात माणसाला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे

सत्य शोधण्याच्या कामात माणसाला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे ~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
********************************************
"आधुनिक विचारांची प्रणाली कोणत्या दिशेने वाहते आहे ते मला माहीत आहे. आणि मी तुम्हाला हेही सांगून ठेवतो की, कार्ल मार्क्सच्या तत्त्वज्ञानाशीही मी काही अपरिचित नाही. त्याचे धार्मिक विचारही मला अपरिचित नाहीत. तो म्हणतो की धर्म म्हणजे अफू आहे! पण त्याचे हे म्हणणे मला पटण्यासारखे नाही. मला वाटते की सत्य शोधून काढणे म्हणजेच सत्यधर्म. सत्य आणि सत्ता या गोष्टी परस्परपूरक नाहीत. (Truth and authority are inconsistent). शास्त्रसुद्धा कोणत्याही गोष्टीची परिपूर्णता (Finality) मान्य करीत नाही. म्हणून सत्यसुद्धा कालपरत्वे अपूर्णच असल्याने त्याचा पुन्हा पुन्हा शोध करणेच प्राप्त असते. म्हणूनच जगामध्ये पूर्णतः पवित्र (Sacrosanct) असे काहीच नाही.

सत्य म्हणजेच धर्म आहे हे आम्ही शिकले पाहिजे. 'नहि सत्यात्परो धर्मः' हेच आपले ध्येय असायला पाहिजे. आपण केव्हाही इतरांना दुखविता कामा नये. हीच आमच्या धर्माची खरी शिकवण असली पाहिजे. सत्य शोधण्याच्या कामात माणसाला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, हे आपल्या ह्या काॅलेजचे ध्येय आहे."
~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

************
मार्च १९४७
************
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या भाषणातून:
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)