शिक्षणाच्या अभावी माणूस जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम बनतो

 *"शिक्षणाच्या अभावी माणूस जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम बनतो." ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर* (जुलै १९२७)
*********
"उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस हीनबल होऊन अल्पायुषी होतो. तसेच शिक्षणाचे अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम बनतो. अर्थात, मुलांच्या शरिराची व बुद्धीची शक्य तेवढी चांगली जोपासना करणे हे प्रत्येक आईबापाचे कर्तव्य आहे. परंतु बऱ्याचशा लोकांच्या हातून शिक्षण देण्याचे महत्त्वाचे कर्तव्य पार पडत नाही. पोट हे दरेकाच्या मागे लागलेले असते व ते भरण्यास अनेक लोक अनेक प्रकारचे व्यवसाय करीत असतात. एकदा एक व्यवसाय पिढीजात झाला म्हणजे तोच पुढे चालू होतो; त्यात सहसा बदल होत नाही. या अनेक व्यवसायांपैकी शिक्षण हा एक व्यवसाय आहे व ज्या जाती त्यांत पडतात त्यांचा तो धंदा होऊन बसतो. ब्राह्मण लोक शिक्षण घेतात व इतर वर्ग घेत नाहीत याचे तरी कारण हेच की शिक्षण हा जसा ब्राह्मण जातीचा धंदा झाला आहे तसा तो इतर जातींचा झालेला नाही. तुम्ही शिक्षण घ्या म्हटले असता आम्हाला काय ब्राह्मण व्हायचे आहे, असे जे अब्राह्मण लोकांकडून उत्तर मिळते त्याचे इंगित यातच आहे. शिवाय अब्राह्मण लोकांत मुलाबाळांना शिक्षण देण्याची मनापासूनची इच्छा असली तरी ती सहज सफल होत नाही. मुलाला शाळेत घातले तर त्याचा दुहेरी बोजा आईबापांवर पडतो. एक तर मुलगा शाळेत गेला तर त्याच्यापासून होणारी कमाई बंद होते व तो आईबापांच्या अंगावर पोस पडतो. दुसरे, त्याच्या शिक्षणासाठी होणारा खर्च त्याच्या आईबापांस सोसावा लागतो. म्हणजे शिक्षणाच्या पायी कमाईची आयात बंद होऊन खर्चाच्या निर्गतीला मात्र सुरुवात होते. त्यामुळे हातावर कमवून जीवित कंठणाऱ्या आईबापांना खर्चाचा बोजा झेपत नाही व म्हणून त्यांची प्रजा पिढ्यानपिढ्या अज्ञानाच्या गर्तेत खितपत पडलेली असते." ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर.(१९२७)

********
अग्रलेख ("आप घरी बाटा, बाप घरीही बाटा!") : बहिष्कृत भारत, ता. १५ जुलै १९२७
********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १९, पान क्र. २१२-२१८)
********

No comments:

Post a Comment

Suggestions are most welcome