Showing posts with label बुद्ध. Show all posts
Showing posts with label बुद्ध. Show all posts

बुद्ध तत्त्वज्ञानामुळेच जग युद्धापासून दूर व शांततेच्या जवळ जाईल

*"बुद्ध तत्त्वज्ञानामुळेच जग युद्धापासून दूर व शांततेच्या जवळ जाईल." ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

"जगापुढे, विशेषतः आशिया खंडापुढे आज दोनच मार्ग उपलब्ध आहेत. एक बुद्धाचा मार्ग व दुसरा मार्क्सचा मार्ग. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा वेळीच जगाने स्वीकार केला नाही तर कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाचा विजय होणे अपरिहार्य आहे. बुद्धाचे तत्त्वज्ञान हाच जगाला एकमेव आधार आहे व त्याचा जेवढा प्रचार होईल तेवढे जग युद्धापासून दूर व शांततेच्या नजीक जाईल."  ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.

दि. १५ फेब्रुवारी १९५३, नवी दिल्ली.
**********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)

धर्मास ग्लानी का येते?

"मिलिंदाने असा प्रश्न विचारला की धर्मास ग्लानी का येते? नागसेनाने त्याचे उत्तर देऊन त्याची तीन कारणे सांगितली-
पहिले कारण हे की एखादा धर्मच कच्चा असतो. त्या धर्माच्या मूळ तत्त्वांत गांभीर्य नसते. तो कालिक धर्म बनतो व काळापुरता अशा धर्म टिकतो.

दुसरे कारण हे की धर्म प्रचार करणारे विद्वान लोक नसतील तर धर्म ग्लानी होते. ज्ञानी माणसांनी धर्मज्ञान सांगितले पाहिजे. विरोधकांशी वादविवाद करण्यास धर्माचे प्रचारक सिद्ध नसतील तर धर्माला ग्लानी येते.

आणि तिसरे कारण हे की धर्म व धर्माची तत्त्वे विद्वानांसाठी असतात. प्राकृत व सामान्य लोकांकरिता मंदिरे-देवळे असतात. ते तेथे जाऊन आपल्या श्रेष्ठ विभूतीचे पूजन करतात.

आपण बौद्ध धर्म स्विकारतांना ही कारणे लक्षात ठेवली पाहिजे. बौद्ध धर्माची तत्त्वे कालिक, काही काळापुरती आहेत असे कोणासही म्हणता यावयाचे नाही. आज अडीच हजार वर्षांनंतरही बुद्धांची सारी तत्त्वे सर्व जग मानते. अमेरिकेमध्ये बुद्धाच्या दोन हजार संस्था आहेत. इंग्लंडमध्ये तीन लाख रुपये खर्च करून बौद्ध मंदिर बांधण्यात आले आहे. जर्मनीतही तीन-चार हजार बुद्ध संस्था आहेत. बुद्धाची तत्वे अजरामर आहेत. तथापि बुद्धांनी असा दावा केला नाही की हा धर्म ईश्वराचा आहे. बुद्धांनी सांगितले माझे वडील प्राकृत होते; माझी आई प्राकृत बाई होती. हा धर्म तुम्हाला वाटेल तर घ्यावा. हा धर्म जेव्हा तुमच्या बुद्धीला पटेल तेव्हा तो तुम्ही स्वीकारा. एवढी उदारता दुसऱ्या कोणत्याही धर्मात सांगितलेली नाही." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.

दि. १५ ऑक्टोबर १९५६, नागपूर. धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यातील भाषणातून.

बुद्ध तत्त्वज्ञानामुळेच जग युद्धापासून दूर व शांततेच्या जवळ जाईल

"जगापुढे, विशेषतः आशिया खंडापुढे आज दोनच मार्ग उपलब्ध आहेत. एक बुद्धाचा मार्ग व दुसरा मार्क्सचा मार्ग. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा वेळीच जगाने स्वीकार केला नाही तर कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाचा विजय होणे अपरिहार्य आहे. बुद्धाचे तत्त्वज्ञान हाच जगाला एकमेव आधार आहे व त्याचा जेवढा प्रचार होईल तेवढे जग युद्धापासून दूर व शांततेच्या नजीक जाईल."  ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
दि. १५ फेब्रुवारी १९५३, नवी दिल्ली.

बौद्ध धर्म पुन्हा या देशाचा धर्म होईल

"बुद्ध या देशात 80 वर्षे जगला. या देशात त्याने आपल्या आयुष्याची 45 वर्षे प्रचारात घालविली. आज जशी शंकराचार्याला मोटार आहे तशी त्याच्याजवळ मोटार नव्हती. साधा गाडीघोडाही नव्हता. वाहतुकीचे एकही साधन त्याला उपलब्ध नव्हते. तरीपण देश-कल्याणाकरिता तो जम्मुपासून कन्याकुमारीपर्यंत अक्षरशः पाणी फिरला. बाराशे वर्षांपर्यंत बुद्धधर्म या देशात चालू होता. ज्याने भिक्षा मागून आपले जीवन जगविले, अनंत हाल सोसले, त्याचे नावही या देशात निघत नाही.
केव्हा केव्हा खोट्याचा जय होतो, खर्‍याचा जय होत नाही. तसाच काहीसा हा प्रकार आहे. पण सर्वांनी ध्यानात ठेवावे की सत्याचाही केव्हातरी जय होईलच. आणि आज ती वेळ आली आहे. बाराशे वर्षांचा धर्म पुनरपि या देशाचा धर्म होईल, अशी माझी खात्री आहे." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.

दि. १४ जानेवारी १९५१, वरळी, मुंबई येथील बुद्धदूत सोसायटीच्या विद्यमाने भरविण्यात आलेल्या बुद्धमेळ्यात केलेल्या भाषणातून.

जाती मोडण्यासाठी बौद्ध धर्माचा स्वीकार हाच एक उपाय

"धर्म शुद्ध तत्त्वावर आधारित असला पाहिजे. बुद्धाचा वर्णाश्रम पद्धतीवर कधीच विश्वास नव्हता. 'आपण सर्व सारखेच आहोत' ही गोष्ट आपण कधीच विसरता कामा नये. माणसा-माणसात कसलाच भेदभाव नाही. जन्माने उच्च नीच कोणीच असू शकत नाही. उच्चनीचता करणीने प्राप्त होते. या गोष्टी बुद्धाने सांगितल्या आहेत. जर लोक पुन्हा बुद्धाचा अंगीकार करतील तर हा देश पुन्हा वैभवाप्रत गेल्यावाचून राहणार नाही. एरव्ही दुसऱ्या कोणत्याही मार्गाने जातीभेद जाणे शक्य नाही. परंतु खरोखरच कोणाला जाती मोडायच्या असतील तर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करावा; हाच एक उपाय आहे." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
 
दि. २० मे १९५१, नवी दिल्ली येथे बुद्ध जयंतीला केलेल्या भाषणातून.

धर्माच्या नावावर जमविलेल्या पैशाचा विनियोग

"धर्माच्या बाबतीत आपण चुकीच्या मार्गाने गेलो आहोत, एवढेच नव्हे तर आजकालच्या काळात धर्माच्या नावावर पैसा गोळा करून तो अनिष्ट बाबींवर खर्च केला जातो. आज जगात दारिद्र्य आणि दुःख असताना अशारितीने धर्माच्या नावावर पैसा जमवून तो ब्राम्हणादि आणि उत्सवावर खर्च करणे हा एक भयंकर गुन्हा आहे. गौतम बुद्धांनी हा प्रश्न व्यवस्थितपणे हाताळला होता. त्यांनी आपल्या नैतिक शास्त्रात पंचशील, अष्टांग मार्ग आणि निर्वाण फार उत्कृष्ट रीतीने सांगितले आहेत. याशिवाय त्यांनी आपल्या अनुयायांना खालील दहा तत्त्वे आत्मसात करण्यास सांगितली आहेत. ती अशी: (१) प्रज्ञा, (२) शील, (३) नेखम्म, (४) दान, (५) वीर्य, (६) खन्ति, (७) सच्च, (८) अधित्थान, (९) मैत्री, (१०) उपेक्खा.

ज्यामुळे अज्ञानांधकार नाहीसा होतो ती प्रज्ञा म्हणजे ज्ञानरूपी प्रकाश; शील म्हणजे नैतिक विचार; कोणतीही वाईट गोष्ट करू नये, परंतु चांगली गोष्ट मात्र सतत करीत राहावे. नेखम्म म्हणजे ऐहिक सुखापासून अलिप्त राहणे. दान म्हणजे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता दुसऱ्यासाठी तन-मन-धन अर्पण करणे. वीर्य म्हणजे धैर्य, कसोटी की ज्यामुळे हाती घेतलेल्या कामात कधी माघार न घेणे. खन्ति म्हणजे सहनशीलता. द्वेषाला द्वेषाला उत्तर न देणे. सच्च म्हणजे सत्य. प्रत्येकाने खोटे कधी बोलू नये. सत्य बोलावे. जे बोलावे ते सत्यच असावे. अधित्थान
म्हणजे मनोनिग्रह. मैत्री म्हणजे प्रेम. मग ती मित्राविषयी असो किंवा शत्रूविषयी असो. मानवाविषयी असो किंवा इतर प्राणीमात्राविषयी असो. उपेख्खा म्हणजे उपेक्षा, ज्यामुळे मन सुखदुःखाच्या पलीकडे गेले असून कोणत्याही परिणामाने विचलित न होता कर्तव्यपरायण राहणे. वरीलपैकी जास्तीत जास्त गुण प्रत्येक माणसाने आत्मसात करावे अशी बुद्धाची अपेक्षा होती. म्हणूनच पाली वाङ्मयात असे म्हटले आहे की गौतम बुद्धांनी वरीलप्रमाणे "दान पारमिता" जरी शिकविली असली तरी दान हे सत्पात्री असण्याबद्दल त्यांचा कटाक्ष होताच. देण्यासाठी दाता जरी प्रवृत्त झाला तरी त्यामुळे ज्याला दान दिले जाते त्याला मात्र त्याने कमीपणा येता कामा नये. पददलितांना एक दिवस स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सामर्थ्य निर्माण करणारी शक्ती जिला आपण मदत म्हणतो तेच खरे दान. साधुसंतांच्या नावावर पैसा जमा केला असेल तर त्याचा पारमिता मध्ये सांगितलेल्या तत्त्वाप्रमाणे विनियोग करणे अत्यंत आवश्यक आहे. दारिद्र्य, अज्ञान, रोगराई इतकी आहे की सध्याच्या काळात ती नष्ट करण्यासाठी असा पैसा खर्च न करता तो धनिकांसाठी खर्च करणे म्हणजे दुष्टपणा ठरेल. त्या पैशाचा विनियोग रुग्णालये, शिक्षण, बेकारांसाठी छोटे छोटे धंदे, गरीब व अनाथ महिलांसाठी काहीतरी धंदे-शिक्षण देणे, अशा कार्यावर त्यांनी करावा. आपण जर जमा केलेल्या पैशाचा विनियोग अशा रीतीने केला तर त्यामुळे आपल्या कार्याची वाहवा होईल." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
दि. २४ जानेवारी १९५४, झेवियर कॉलेजचे मैदान, अखिल भारतीय साई भक्त संमेलन

गरीब पीडितांना दुःखातून मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य

गरीब पीडितांना दुःखातून मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य आहे ~डॉ. बी. आर. आंबेडकर
*******************************
"बौद्ध धर्माचा मूळ पाया काय आहे? इतर धर्मात व बौद्ध धर्मात फरक आहे. इतर धर्मात बदल हा घडून यावयाचा नाही, कारण मनुष्य व ईश्वर यांचा संबंध ते धर्म सांगतात. इतर धर्मांचे म्हणणे असे की ईश्वराने सृष्टी निर्माण केली. ईश्वराने आकाश, वायू, चंद्र, सूर्य सर्व काही निर्माण केले. आम्हाला ईश्वराने काहीही करावयाचे शिल्लक ठेवले नाही, म्हणून ईश्वरास भजावे! ख्रिस्ती धर्माप्रमाणे तर निर्णयाचा एक दिवस (Day of Judgement) असतो व त्या निर्णयाप्रमाणे सर्व काही घडते. देव व आत्मा यांना बौद्ध धर्मात जागा नाही. भगवान बुद्धांनी सांगितले, जगात सर्वत्र दुःख आहे; 90% माणसे दुःखाने पिडलेली आहेत. त्या दुःखातून पिडलेल्या गरीब माणसांना मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य आहे."  ~डॉ. बी. आर. आंबेडकर

विद्या ही अन्नासारखी सर्व मनुष्यास आवश्यक आहे

"बौद्धधर्माशी संलग्न झालेले 'मिलिंद' हे नाव महाविद्यालयास देण्याचे दुसरे कारण असे की, विद्या ही अन्नासारखी सर्व मनुष्यास आवश्यक आहे. प्रत्येकाला तिचा लाभ झाला पाहिजे; हा उदार विचार पहिल्यांदा उद्घोषित केला असेल तर तो भगवान बुद्धांनीच. तेव्हा ज्या असंख्य लोकांना कैक शतके अज्ञानात दडपून ठेवण्यात आले त्यांना सुविद्य बनविण्याचा प्रारंभ करताना बुद्धाचे अथवा त्याच्या शिष्याचे नाव आठवावे हे स्वाभाविकच आहे."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर. १२ डिसेंबर, १९५५.