धर्माच्या नावावर जमविलेल्या पैशाचा विनियोग

"धर्माच्या बाबतीत आपण चुकीच्या मार्गाने गेलो आहोत, एवढेच नव्हे तर आजकालच्या काळात धर्माच्या नावावर पैसा गोळा करून तो अनिष्ट बाबींवर खर्च केला जातो. आज जगात दारिद्र्य आणि दुःख असताना अशारितीने धर्माच्या नावावर पैसा जमवून तो ब्राम्हणादि आणि उत्सवावर खर्च करणे हा एक भयंकर गुन्हा आहे. गौतम बुद्धांनी हा प्रश्न व्यवस्थितपणे हाताळला होता. त्यांनी आपल्या नैतिक शास्त्रात पंचशील, अष्टांग मार्ग आणि निर्वाण फार उत्कृष्ट रीतीने सांगितले आहेत. याशिवाय त्यांनी आपल्या अनुयायांना खालील दहा तत्त्वे आत्मसात करण्यास सांगितली आहेत. ती अशी: (१) प्रज्ञा, (२) शील, (३) नेखम्म, (४) दान, (५) वीर्य, (६) खन्ति, (७) सच्च, (८) अधित्थान, (९) मैत्री, (१०) उपेक्खा.

ज्यामुळे अज्ञानांधकार नाहीसा होतो ती प्रज्ञा म्हणजे ज्ञानरूपी प्रकाश; शील म्हणजे नैतिक विचार; कोणतीही वाईट गोष्ट करू नये, परंतु चांगली गोष्ट मात्र सतत करीत राहावे. नेखम्म म्हणजे ऐहिक सुखापासून अलिप्त राहणे. दान म्हणजे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता दुसऱ्यासाठी तन-मन-धन अर्पण करणे. वीर्य म्हणजे धैर्य, कसोटी की ज्यामुळे हाती घेतलेल्या कामात कधी माघार न घेणे. खन्ति म्हणजे सहनशीलता. द्वेषाला द्वेषाला उत्तर न देणे. सच्च म्हणजे सत्य. प्रत्येकाने खोटे कधी बोलू नये. सत्य बोलावे. जे बोलावे ते सत्यच असावे. अधित्थान
म्हणजे मनोनिग्रह. मैत्री म्हणजे प्रेम. मग ती मित्राविषयी असो किंवा शत्रूविषयी असो. मानवाविषयी असो किंवा इतर प्राणीमात्राविषयी असो. उपेख्खा म्हणजे उपेक्षा, ज्यामुळे मन सुखदुःखाच्या पलीकडे गेले असून कोणत्याही परिणामाने विचलित न होता कर्तव्यपरायण राहणे. वरीलपैकी जास्तीत जास्त गुण प्रत्येक माणसाने आत्मसात करावे अशी बुद्धाची अपेक्षा होती. म्हणूनच पाली वाङ्मयात असे म्हटले आहे की गौतम बुद्धांनी वरीलप्रमाणे "दान पारमिता" जरी शिकविली असली तरी दान हे सत्पात्री असण्याबद्दल त्यांचा कटाक्ष होताच. देण्यासाठी दाता जरी प्रवृत्त झाला तरी त्यामुळे ज्याला दान दिले जाते त्याला मात्र त्याने कमीपणा येता कामा नये. पददलितांना एक दिवस स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सामर्थ्य निर्माण करणारी शक्ती जिला आपण मदत म्हणतो तेच खरे दान. साधुसंतांच्या नावावर पैसा जमा केला असेल तर त्याचा पारमिता मध्ये सांगितलेल्या तत्त्वाप्रमाणे विनियोग करणे अत्यंत आवश्यक आहे. दारिद्र्य, अज्ञान, रोगराई इतकी आहे की सध्याच्या काळात ती नष्ट करण्यासाठी असा पैसा खर्च न करता तो धनिकांसाठी खर्च करणे म्हणजे दुष्टपणा ठरेल. त्या पैशाचा विनियोग रुग्णालये, शिक्षण, बेकारांसाठी छोटे छोटे धंदे, गरीब व अनाथ महिलांसाठी काहीतरी धंदे-शिक्षण देणे, अशा कार्यावर त्यांनी करावा. आपण जर जमा केलेल्या पैशाचा विनियोग अशा रीतीने केला तर त्यामुळे आपल्या कार्याची वाहवा होईल." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
दि. २४ जानेवारी १९५४, झेवियर कॉलेजचे मैदान, अखिल भारतीय साई भक्त संमेलन

No comments:

Post a Comment

Suggestions are most welcome