"स्वातंत्र्य, समता व भ्रातृभाव यांच्या आपण खूप गप्पा मारतो. नव्हे, या त्रयीवर आपण व्याखानेही झोडू शकतो. परंतु या तिन्हीपैकी एकतरी आपल्या भारतीय समाजात बसत आहे की नाही याचा विचारही आपण करीत नाही. जणू काही तत्त्वांची आणि व्यवहाराची सांगड घालण्याची आपणावर काहीच जबाबदारी नसल्याचे वाटते.
भारतामध्ये बहुसंख्य जनता अज्ञान आणि भोळसर खुळ्या कल्पनेत गुरफटून गेली आहे. नव्हे, येथील समाजरचनाच खुळ्या कल्पनांना जन्म देते. म्हणून उपास-तापास, नवस-सायास, देव-देवऋषी करणे म्हणजे धर्म पालन करणे अशी लोकांची भावना झालेली आहे. या खुळ्या आणि धर्मभोळ्या जनतेची या कल्पनेतून सुटका करावयास पाहिजे. विद्यार्थ्यांनी चाळी-चाळीत जाऊन जनतेचे अज्ञान आणि खुळ्या समजुती दूर केल्या पाहिजेत. तरच आपल्या शिक्षणाचा जनतेला काहीतरी लाभ होईल. आपण आपल्या ज्ञानाचा केवळ परीक्षा पास करण्यासाठी उपयोग करून चालणार नाही. ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या बांधवांची सुधारणा व प्रगती करण्याकरिता केला पाहिजे. तरच भारत उन्नतावस्थेला जाईल.
जगातील अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सुटलेले नाहीत. ते सोडविण्याचा मानव सारखा प्रयत्न करीत आहे. त्यासाठीच निरनिराळे सिद्धांत पुढे मांडण्यात येतात. कार्ल मार्क्स आज आपणापुढे खरा प्रश्न आहे. आजचे प्रश्न सोडविण्यास मार्क्सच्या विचारसरणीऐवजी दुसरी एखादी प्रभावी विचारसरणी उपयोगी पडेल काय? हाच आजच्या काळाचा प्रश्न आहे. आपले सारे प्रश्न सोडविण्यास कार्ल मार्क्सचे सिद्धांत समर्थ ठरतील की नाही हीच आजची समस्या आहे. ही समस्या आजच्या पिढीने शक्य तितक्या लवकर सोडविली पाहिजे." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
दि. २ मे १९५४, सिद्धार्थ कॉलेज, मुंबई येथील यूथ असेंब्लीच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणातून
**********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)
No comments:
Post a Comment
Suggestions are most welcome