पहिले कारण हे की एखादा धर्मच कच्चा असतो. त्या धर्माच्या मूळ तत्त्वांत गांभीर्य नसते. तो कालिक धर्म बनतो व काळापुरता अशा धर्म टिकतो.
दुसरे कारण हे की धर्म प्रचार करणारे विद्वान लोक नसतील तर धर्म ग्लानी होते. ज्ञानी माणसांनी धर्मज्ञान सांगितले पाहिजे. विरोधकांशी वादविवाद करण्यास धर्माचे प्रचारक सिद्ध नसतील तर धर्माला ग्लानी येते.
आणि तिसरे कारण हे की धर्म व धर्माची तत्त्वे विद्वानांसाठी असतात. प्राकृत व सामान्य लोकांकरिता मंदिरे-देवळे असतात. ते तेथे जाऊन आपल्या श्रेष्ठ विभूतीचे पूजन करतात.
आपण बौद्ध धर्म स्विकारतांना ही कारणे लक्षात ठेवली पाहिजे. बौद्ध धर्माची तत्त्वे कालिक, काही काळापुरती आहेत असे कोणासही म्हणता यावयाचे नाही. आज अडीच हजार वर्षांनंतरही बुद्धांची सारी तत्त्वे सर्व जग मानते. अमेरिकेमध्ये बुद्धाच्या दोन हजार संस्था आहेत. इंग्लंडमध्ये तीन लाख रुपये खर्च करून बौद्ध मंदिर बांधण्यात आले आहे. जर्मनीतही तीन-चार हजार बुद्ध संस्था आहेत. बुद्धाची तत्वे अजरामर आहेत. तथापि बुद्धांनी असा दावा केला नाही की हा धर्म ईश्वराचा आहे. बुद्धांनी सांगितले माझे वडील प्राकृत होते; माझी आई प्राकृत बाई होती. हा धर्म तुम्हाला वाटेल तर घ्यावा. हा धर्म जेव्हा तुमच्या बुद्धीला पटेल तेव्हा तो तुम्ही स्वीकारा. एवढी उदारता दुसऱ्या कोणत्याही धर्मात सांगितलेली नाही." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
दि. १५ ऑक्टोबर १९५६, नागपूर. धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यातील भाषणातून.
No comments:
Post a Comment
Suggestions are most welcome