सत्यशोधकी चळवळ म्हणजे समानतेची व सद्धर्माची चळवळ

 *"आम्हीही सत्यशोधकीच आहोत; सत्यशोधकी चळवळ म्हणजे, समानतेची व सद्धर्माची चळवळ." ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर* (बहिष्कृत भारत, ३ फेब्रुवारी १९२८)
*********

"आमच्या मित्रांना आमच्या चळवळीस सत्यशोधकी वळण लागेल याचे भय वाटत आहे. सत्यशोधकी चळवळ म्हणजे ब्राह्मणाचा द्वेष करणारी, राजकारणांत भाग न घेणारी, सरकारच्या नजरेकडे लक्ष ठेवून काम करणारी अशी आजपर्यंतची महाराष्ट्रांतील रुढ कल्पना आहे. व या कल्पनेंत समाविष्ट असलेले वळण अस्पृश्यांच्या चळवळीस न लागेल अशी खबरदारी घेण्याविषयी त्यांनी आम्हांस इशारा दिला आहे. आमच्या मित्रास आम्ही असे सुचवितो की, आम्हीही सत्यशोधकीच आहोत. व त्याबद्दल आम्हांस कोणत्याही तर्‍हेचा विषाद न वाटता उलट आनंदच वाटतो. *सत्यशोधकी चळवळ म्हणजे समानतेची व सद्धर्माची चळवळ असे आमचे ठाम मत आहे. इतकेच नव्हे तर दरेक स्वराज्यवाद्याने सत्यशोधकी असलेच पाहिजे असे आमचे ठाम मत आहे.* आमच्या मित्रांनी चालू सत्यशोधकी चळवळीवर जो आरोप केला आहे तो मात्र काही अंशी खरा आहे असे कबूल करणे प्राप्त आहे. परंतु हे वळण या चळवळीस का लागले याचा विचार आमच्या मित्रांनी जितका करावयास पाहिजे होता तितका केला नाही असे आम्हास म्हणावे लागते. सत्यशोधकी चळवळीला अशा प्रकारचे अनिष्ट वळण लागल्याचे मुख्य कारण म्हटले म्हणजे ब्राह्मण जातीचा त्या चळवळीस होणारा एकजात विरोध हेच होय. *ब्राह्मण जातीतील काही लोकांनी तरी सत्यशोधकी चळवळीने आपल्यापुढे मांडलेली समानतेची व सद्धर्माची तत्त्वे मान्य केली असती तर सत्यशोधकी चळवळीस ब्राह्मण द्वेषाचे भूत लागले नसते. किंवा तिच्या प्रसारार्थ तिला सरकारची कासही धरावी लागली नसती.* अशी परिस्थिती असल्याकारणाने आमच्या मित्रांस आमची अशी सूचना आहे की, त्यांनी सत्यशोधक व्हावे आणि आपल्या जातभाईसहि सत्यशोधक बनविण्याचा प्रयत्न करावा." ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर.(१९२८)

********
आजकालचे प्रश्न: बहिष्कृत भारत, ता. ३ फेब्रुवारी १९२८
********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १९, पान क्र. ३१८-३३२)
********

No comments:

Post a Comment

Suggestions are most welcome