डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या "मुक्ती कोन पथे?" या ऐतिहासिक भाषणातून (13 ऑक्टोबर 1935, येवले, महाराष्ट्र)
"या असमानतेच्या अन्यायात सांत्वन करण्याच्या हेतूने काही स्पृश्य लोक अस्पृश्यांना सांगतात की तुम्ही शिक्षण घ्या, म्हणजे तुम्हाला शिवू! तुम्ही स्वच्छ रहा म्हणजे तुम्हाला शिवू! आणि समानतेने वागवू! खरे म्हटले असता, अडाणी महाराची, दरिद्री महाराची आणि अस्वच्छ महाराची जी गत होते तीच गत शिकलेल्या महाराची, पैसेवाल्या महारची आणि स्वच्छ राहणार्या महाराची होते. हे तुम्हा आम्हा सर्वांना अनुभवाने माहीत आहे. पण तो प्रश्न जरी बाजूला ठेवला तरी जर शिक्षण घेतल्याशिवाय, हाती पैसा असल्याशिवाय, अंगावर पोषाख असल्याशिवाय मानमान्यता मिळणार नाही, तर साध्या महाराने काय करावे? ज्याला शिक्षण प्राप्त होऊ शकत नाही, ज्याला पैसा मिळू शकत नाही आणि ज्याला नीटनेटका पोषाख करता येत नाही, त्या महाराला समानता कशी मिळणार? ख्रिस्ती धर्मात, मुसलमानी धर्मात जी समानतेची शिकवण देण्यात आली आहे तिचा संबंध विद्या, धन, पोषाख, पराक्रम अशा बाह्य वस्तूंशी मुळीच नाही. माणसाचे मनुष्यत्व हीच महत्त्वाची गोष्ट आहे, असे दोन्ही धर्म मानतात आणि ते मनुष्यत्व सर्वांना आदरणीय असले पाहिजे. कोणी कोणाचा अवमान करु नये व कोणी कोणाला असमान मानू नये, असे ते धर्म शिकवतात. हिंदू धर्मात या शिकवणीचा पूर्ण अभाव आहे. ज्या धर्मात मनुष्याच्या मनुष्यत्वाला व त्याच्या माणुसकीला काही किंमत नाही तो धर्म काय कामाचा? आणि त्याला कवटाळून धरून राहण्यात काय हशील आहे?" ~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(खंड 18, भाग 1)
No comments:
Post a Comment
Suggestions are most welcome