सर्वसाधारण जागेवर अस्पृश्य उमेदवार उभा करून कॉंग्रेसने आपला प्रांजळपणा सिद्ध करावा

 *"अस्पृश्य लोकांसंबंधीचा कॉंग्रेसचा हेतू प्रांजळ असेल तर ते सर्वसाधारण जागेवर अस्पृश्य उमेदवार उभा करून आपला प्रांजळपणा सिद्ध का करीत नाहीत?" ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
*********
ता. २७ ऑक्टोबर १९५१, जालंदर.
*****
"विभाजनानंतर पाकिस्तान सरकारने अस्पृश्यांना पाकिस्तानातून भारतात येण्यावर बंदी घालणारे एक फर्मान काढले. कितीही हिंदूंनी पाकिस्तान सोडले तरी पाक सरकारने त्यांची पर्वा केली नाही; परंतु अस्पृश्यांनी पाकिस्तान सोडले तर मैला वाहण्याचे, सडका झाडण्याचे, मेलेली जनावरे उचलण्याचे तिरस्करणीय जातीचे घाणेरडे धंदे कोण करणार होते? मी पं. नेहरूंना विनंती केली की या लोकांच्या स्थलांतर करण्यावर बंदी घालणारा हा आदेश काढून घेण्यासंबंधी काहीतरी कारवाई करा. परंतु त्यांनी काहीही केले नाही. या समस्येसंबंधी ते झोपी गेले आणि पाकिस्तानशी ज्या काही चर्चा वेळोवेळी झाल्या त्यावेळी त्यांनी या प्रश्नाचा प्रासंगिक उल्लेखही केला नाही. एकाकीपणे जेवढे मला करता येणे शक्य होते तेवढे मी केले आहे. महार बटालियनच्या शूर शिपायांनी गंभीर धोका पत्करून मला मदत केली आणि पाकिस्तानातून अनेक अस्पृश्य लोकांना आणले.

अशा स्थितीत आम्ही काँग्रेस पुढाऱ्यांच्या आश्वासनावर विश्वास कसा ठेवावा? अस्पृश्य लोकांसंबंधीचा कॉंग्रेसचा हेतू प्रांजळ असेल तर ते सर्वसाधारण जागेवर अस्पृश्य उमेदवार उभा करून आपला प्रांजळपणा सिद्ध का करीत नाहीत?" ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३, पान क्र. २५१)
********

बुद्ध तत्त्वज्ञानामुळेच जग युद्धापासून दूर व शांततेच्या जवळ जाईल

*"बुद्ध तत्त्वज्ञानामुळेच जग युद्धापासून दूर व शांततेच्या जवळ जाईल." ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

"जगापुढे, विशेषतः आशिया खंडापुढे आज दोनच मार्ग उपलब्ध आहेत. एक बुद्धाचा मार्ग व दुसरा मार्क्सचा मार्ग. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा वेळीच जगाने स्वीकार केला नाही तर कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाचा विजय होणे अपरिहार्य आहे. बुद्धाचे तत्त्वज्ञान हाच जगाला एकमेव आधार आहे व त्याचा जेवढा प्रचार होईल तेवढे जग युद्धापासून दूर व शांततेच्या नजीक जाईल."  ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.

दि. १५ फेब्रुवारी १९५३, नवी दिल्ली.
**********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)

डॉ. आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत

*"डॉ. आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत." ~राजर्षी छत्रपती शाहू महाराज*

(दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची पहिली परिषद, माणगाव, संस्थान कागल- दिवस दुसरा. या दिवशी झालेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या ऐतिहासिक भाषणातून...)

"... मी येथे जमलेल्या सर्व लोकांस हीच विनंती करितो की, आतापर्यंत आम्ही निकृष्ट अवस्थेस पोहचण्याचे कारण आम्ही आमचा योग्य पुढारी योजून काढत नाही. गोड बोलून नावलौकिक मिळविण्याच्या हेतूने आमच्यापैकी काही आपलपोटी मंडळी अयोग्य पुढारी नेमून देऊन अज्ञानी लोकांना फसवितात. पशुपक्षी देखील आपल्याच जातीचा पुढारी करितात. पक्ष्यांत कधी चतुष्पादाचा पुढारी झाला नाही. चतुष्पादी कधीही पक्ष्यांचा पुढारी नसतो. गाय, बैल, मेंढरे यात मात्र धनगर त्यांचा पुढारी असतो. त्यामुळे शेवटी त्यांना कसाबखान्यात जावे लागते!"

"...आज त्यांना पंडित ही पदवी देण्यास तरी काय हरकत आहे? विद्वानांत ते एक भूषणच आहेत. आर्यसमाज, बुद्धसमाज व ख्रिस्ती यांनी त्यांना आपल्यात आनंदाने घेतले असते. परंतु ते तुमचा उद्धार करण्याकरिता तिकडे गेले नाहीत. याबद्दल तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजेत व मीही मानतो."

"माझ्या राज्यातील बहिष्कृत प्रजाजनांनो, तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला ह्याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की, डॉ. आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की, ते सर्व हिंदुस्तानचे पुढारी होतील अशी माझी मनोदेवता मला सांगते." ~राजर्षी शाहू महाराज

माणगाव, 22 मार्च 1920
**********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग १)

नैसर्गिक गुण व सानुकूल परिस्थिती ही उन्नतीची आद्य कारणे

 *"आपल्या लोकात आपल्या उन्नतीबद्दल दिसून येत असलेली कळकळ अपूर्व आहे." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर*

(दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची पहिली परिषद, माणगाव, संस्थान कागल- दिवस पहिला. ~याच माणगावच्या परिषदेत दुसऱ्या दिवशी राजर्षी शाहू महाराजांचे भाषण झाले.)

"ही परिषद अनेक दृष्टींनी अपूर्व आहे. मुंबई इलाख्यातील परिषदेचा हा तसा पहिलाच प्रसंग आहे व आपल्या लोकात आपल्या जातीबद्दल दिसून येत असलेली कळकळ ही देखील तितकीच अपूर्व आहे. त्याचप्रमाणे बहिष्कृत वर्गात दिसून येत असलेली विचारक्रांतीही तशीच अपूर्व आहे. आजवर आपल्या लोकास वाटत होते की आपली वाईट स्थिती होण्याचे कारण आपले दुर्भाग्य होय आणि दुर्भाग्याला आळा घालणे आपल्या हाती नसल्याकारणाने आहे ती बिकट स्थिती आपण निमूटपणे सोसली पाहिजे. हल्लीच्या पिढीला मात्र आपली परिस्थिती ईश्वरी लीलेचा परिपाक आहे असे वाटत नसून ती इतरांच्या दुष्कृत्यांचा परिणाम आहे असे वाटू लागले आहे.

ज्या हिंदू धर्माचे आपण घटक आहोत त्या हिंदू धर्माच्या व्यवहारात मनुष्यमात्राचे संघटन दोन आदितत्त्वांना धरून झालेले दृष्टीस पडते. एक जन्मसिद्ध योग्य-अयोग्यता व दुसरी जन्मसिद्ध पवित्र-अपवित्रता. या दोन तत्त्वांनुरूप हिंदू लोकांची विभागणी केली तर त्याचे तीन वर्ग होतात. १.जन्माने सर्वात श्रेष्ठ व पवित्र ज्याला आपण ब्राह्मण वर्ग असे म्हणतो तो. २.ज्यांची जन्मसिद्ध श्रेष्ठता व पवित्रता ब्राह्मणापेक्षा कमी दर्जाची आहे असा जो वर्ग तो ब्राह्मणेतर वर्ग ३.जे जन्मसिद्ध कनिष्ठ व अपवित्र अशांचा जो तो आपला बहिष्कृत वर्ग होय. अशारीतीने वर्गीकरण करून धर्माने ठरवून दिलेल्या श्रेष्ठतेच्या व पवित्रतेच्या विषम प्रमाणांचा या तीन वर्गांवर परिणाम झाला आहे. *जन्मसिद्ध श्रेष्ठतेमुळे व  पवित्रतेमुळे गुणहीन ब्राह्मणांचे देखील कल्याण झाले आहे.* ब्राम्हणेतरास जन्मसिद्ध अयोग्यतेचा मारा आहे. त्यांच्यात विद्या नाही म्हणून ते आज मागे राहिले आहेत. तरीपण विद्या व द्रव्य मिळविण्याचे मार्ग त्यांना मोकळे आहेत. ही दोन्ही जरी त्यांच्याजवळ आज नसतील तरी त्यांना ती उद्या मिळणार आहे. आपल्या बहिष्कृत वर्गाची स्थिती मात्र जन्मसिद्ध अयोग्यतेमुळे व अपवित्रतेमुळे फारच शोचनीय झाली आहे. अनेक दिवस अयोग्य व अपवित्र मानून घेतल्यामुळे *नैतिकदृष्ट्या आपल्यातील आत्मबल व स्वाभिमान ही जी उन्नतीची आद्य कारणे* ती अगदी लोपून गेली आहेत. सामाजिकदृष्ट्या हिंदू धर्माप्रमाणे त्यांना हक्क नाहीत. त्यांना शाळेत जाता येत नाही. सार्वजनिक विहिरीवर पाणी भरता येत नाही व रस्त्यावर चालता येत नाही. वाहनाचा उपयोग करून घेता येत नाही. इत्यादी प्रकारच्या कनिष्ठ हक्कांनादेखील ते दुरावले आहेत. जन्मसिद्ध अयोग्यतेमुळे व अपवित्रतेमुळे आर्थिकदृष्ट्या त्यांचे तितकेच नुकसान झाले आहे. व्यापार, नोकरी व शेती हे जे धनसंचयाचे तीन मार्ग आहेत ते त्यांना खुले नाहीत. विटाळामुळे गिर्‍हाईक मिळत नसल्याकारणाने त्यांना व्यापार करण्याची सोय उरली नाही. शिवाशिवीमुळे त्यांना नोकरी मिळत नाही व कधीकधी गुणाने योग्य असूनही खालच्या जातीचे असल्यामुळे इतर लोक त्यांच्या हाताखाली नोकरी करण्यास कचरतात. म्हणून त्यांना नोकरी मिळणे जड जाते. याच भावनेमुळे मिलिटरीतून त्यांचा उठाव झाला आहे. शेतीच्या बाबत त्यांची तीच दशा आहे. अशा हाडकी हडवळ्यापेक्षा भुईचा तुकडा विशेष कोणाला आहे? 
 
अशाप्रकारे नाडलेल्या समाजाची उन्नती होणार नाही. *नैसर्गिक गुण व सानुकूल परिस्थिती ही दोन उन्नतीची आद्य कारणे आहेत. बहिष्कृत वर्गात नैसर्गिक गुणांची वाण नाही हे सर्वांस मान्य आहे. परंतु त्यांचा विकास होत नाही याचे मूळ कारण त्यांना परिस्थिती सानुकूल नाही हे होय.* परिस्थिती सानुकूल करून घेण्यास अनेक उपाय सुचविले जातात; परंतु याकरिता आपण राजकीय सामर्थ्य संपादिले पाहिजे व जातवार प्रतिनिधित्व मिळाल्याशिवाय आपल्या हाती राजकीय सामर्थ्य येणार नाही. "सत्यमेव जयते" हे तत्त्व पोकळ आहे. सत्याचा जय होण्यास आपण आपली चळवळ कायम ठेवली पाहिजे." ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर


माणगाव, 21 मार्च 1920
**********
मूकनायक: 10 एप्रिल 1920
**********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग १)

ज्या देशाला नीतिमत्ता नाही त्या देशाचे भवितव्य खडतर आहे

*"आज देशात चारित्र्य उरलेले नाही. ज्या देशाला नीतिमत्ता नाही त्या देशाचे भवितव्य खडतर आहे." ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

मुंबईच्या फेमस स्टुडिओमध्ये रविवार दिनांक 31 जानेवारी 1954 रोजी आचार्य अत्रे यांच्या *'महात्मा फुले'* या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त समारंभ मोठ्या थाटामाटाने साजरा करण्यात आला. समारंभाचे अध्यक्षस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारले होते आणि कर्मवीर भाऊराव पाटील आशीर्वाद देण्यासाठी आचार्य अत्रे यांच्या निमंत्रणावरून उपस्थित झाले होते.

श्री. प्र. के. अत्रे उपस्थित पाहुण्यांचे आभार मानताना म्हणाले, "महात्मा फुले ह्यांचे क्रांतिकारक जीवन रूपेरी पडद्यावर आणण्याचे माझे अनेक वर्षांचे स्वप्न आज साकार होत आहे याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. पुणे शहराच्या ज्या विभागात फुले यांनी शंभर वर्षांपूर्वी काम केले त्याच क्षेत्रात माझी अनेक वर्षे गेली. त्यामुळे त्यांच्या कार्याचा आणि परंपरेचा माझ्या मनावर फार परिणाम झाला आहे. या चित्रपटाचा प्रारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते होत आहे हा सर्वात मोठा सुयोग आहे. कारण महात्मा फुले ह्यांच्या तत्त्वज्ञानाचे सर्वात मोठे अनुयायी जर कोणी असतील तर ते डॉ. आंबेडकर हेच होत. राजकारणातील, धर्मकारणातील आणि समाजकारणातील डॉ. आंबेडकरांची भूमिका सर्वस्वी महात्मा फुले यांच्यासारखीच आहे. म्हणून महात्मा फुले यांच्याबद्दल त्या काळात जो गैरसमज झाला तोच डॉ. आंबेडकर यांच्या आजही वाट्याला येत आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील हे या चित्रपटाला आशीर्वाद द्यावयास येथे उपस्थित राहिले हाही दुसरा सुयोग आहे. कारण त्यांनी आपले सबंध आयुष्य महात्मा फुले यांच्या तत्त्वज्ञानाच्या प्रचारामध्ये खर्च केले.
इंग्रजी भाषेत फुले यांचे चरित्र लिहिण्याची डॉ. आंबेडकर यांची इच्छा आहे हे मला माहीत आहे. पण साधनांच्या अभावी ते तसेच पडून आहे. माझे काम झाल्यानंतर सर्व सामुग्री त्यांच्या हवाली करण्याची माझी इच्छा आहे. फुले यांच्या जीवनासंबंधी सर्वसामान्य समाजात अज्ञान पसरलेले आहे. या चित्रपटाद्वारे महात्मा फुले यांच्या जीवनाचे दर्शन घडविण्याचा मी प्रयत्न करीत आहे."

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले, "हे काम हाती घेतल्याबद्दल मी श्री. अत्रे यांचे अभिनंदन करतो. कारण जोतीराव फुले हे आद्य समाजसुधारक होत. पूर्वी सामाजिक सुधारणा आधी की राजकीय सुधारणा आधी हा वाद चाले. आधी समाज सुधारणा झाल्या पाहिजेत असे रानडे, गोखले, आगरकर प्रतिपादन करीत; पण टिळकांचा भर राजकीय सुधारणांवर होता. टिळक आपल्या विरोधकांवर याबाबतीत विजय मिळवू शकले नाहीत. पण पुढे महात्मा गांधींनी मात्र समाजसुधारणावाद्यांवर विजय मिळविला. परंतु समाजसुधारणा होण्यापूर्वी देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळाले त्याचे परिणाम फारसे चांगले झालेले नाहीत. आज देशात चारित्र्यच उरलेले नाही. आणि ज्या देशाला नीतिमत्ता नाही त्या देशाचे भवितव्य अतिशय खडतर आहे. जवाहरलाल नेहरू, तुमचे मुख्यमंत्री असोत वा मोरारजी देसाई असोत,  तुमच्या भविष्यात काळोखच भरला आहे. देशाचे मंत्री देशाचा उद्धार करीत नाहीत, तर धर्म ज्याला उत्तम रीतीने समजला आहे तोच देशाला तारू शकेल. महात्मा फुले अशा धर्मसुधारकांपैकी होते. त्यादृष्टीने ह्या थोर समाजसुधारकाच्या जीवनावर आधारलेला हा बोलपट उपयुक्त ठरेल."

जनता: ६ फेब्रुवारी १९५४
**********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)
#आचार्य_अत्रे #महात्मा_फुले #चरित्र #डॉ_आंबेडकर #चित्रपट

DBAWS- 1

*********************
Published by Dr. Babasaheb Ambedkar Source Material Publication Committee, 
Higher Education Dept., Govt. of Maharashtra.
*********************

DBAWS- Dr. Babasaheb Ambedkar Writings and Speeches:

Vol. 1 to Vol. 22

(Vol. 18(~3 parts), vol. 19 and vol. 20 are in Marathi language)


******************************
Source Material on Dr. Babasaheb Ambedkar and the Movement of the untouchables: Vol. 1
Vol. 2 (Marathi)

******************************

Special issue on the occasion of Diamond Jubilee of the book:

At:

1. Annihilation of Caste

2. जातीव्यवस्थेचे निर्मूलन

(मराठी translation of AoC)
******************************

1. Govt Printing, stationary and Publications, M.S.,
    Ground Floor, Government Book Depot & Publication House,
    Netaji Subhash Chandra Bose Road, Mumbai, 400 004.
    (Charni Road)
2. Govt. Photozinco Press and Book Depot, Near G.P.O., Pune 411 001.
3. Govt. Press and Book Depot,
    Civil Lines, Nagpur, 440 001.
4. Govt. Book Depot,
    Shaha Ganj, Near Gandhi Chowk,
    Aurangabad. 431 001.
5. Govt. Press and Stationery Stores, Kolhapur.
******************************

टीका करण्याचा हक्क कोणाचा?

बौद्ध धर्म स्वीकारण्याबद्दल सर्व वर्तमानपत्रात टीका केलेली असायची. त्याचा परामर्श घेताना बाबासाहेब म्हणतात:

"टीका करण्याचा हक्क कोणाचा? कोणी कोणावर टीका करायची? ज्याला सहानुभूती आहे, त्यालाच टीका करण्याचा अधिकार असतो. संरक्षण करणाऱ्यालाच टीका करण्याचा अधिकार आहे. जीव घेणाऱ्याला-मारणाऱ्याला टीका करण्याचा अधिकार नाही. ......म्हणून मला वर्तमानपत्रकर्त्यांना असे विचारावयाचे आहे की तुम्ही आमचे रक्षणकर्ते की आमचे विनाशकर्ते? तुम्ही आहात तरी कोण? हजारो वर्षे आम्ही तुमच्या समाजात वावरत आलो. कोणीतरी पुढे येऊन सांगावे की अस्पृश्यांसाठी ह्या गोष्टी केल्या. अस्पृश्यांच्या उद्धारासाठी ज्यांनी करंगळीसुद्धा वरती केली नाही त्यांना टीका करण्याचा काय अधिकार? ह्या लोकांना माझे असे सांगणे आहे की तुम्ही तोंड गप्प करून बसा. आम्हाला खड्ड्यात पडायचे असेल तर पडू. तुम्ही इतके दिवस आम्हाला खड्ड्यात टाकलं. आता ते स्वातंत्र्य आम्हाला द्या. पडण्याचा अधिकार, चुका करण्याचा अधिकार आम्हाला द्या. तुम्ही कोणत्याही प्रकारची मदत दिली नाही. तुम्ही अस्पृश्यांच्या पोरांना विलायतेला पाठविलं आहे काय? त्यांना ह्या ज्या स्कॉलरशिप्स मिळत आहेत त्या मी मिळविल्या आहेत. आम्ही आमच्या पायावर उभे राहू." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.


दि. ८ मे १९५५, मुंबई, नरे पार्क येथे बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणातून.
**********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)

मी नदीच्या प्रवाहालाच वळविणाऱ्या भक्कम खडकासारखा

"केंद्रीय सरकारात १९४७ साली मी सामील झालो. मी काँग्रेसला मिळालो अशी टीका माझ्या काही टीकाकारांनी माझ्यावर केली. माझ्या टीकाकारांनी केलेल्या निंदेला मी लखनौच्या भाषणात उत्तर दिले आहे. त्या भाषणात माझ्या देशबांधवांना मी सांगितले की पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाणाऱ्या मातीच्या ढेकळाप्रमाणे मी भुसभुशीत नसून मी पाण्यात न विरघळता नदीच्या प्रवाहालाच वळविणाऱ्या एखाद्या भक्कम खडकासारखा आहे. मी कोठेही असलो किंवा कुणाच्याही संगतीत मी राहिलो तरी माझे स्वतःचे वैशिष्ट्य मी कधीही गमावणार नाही. एखाद्या चांगल्या कामासाठी जर कोणी माझ्या सहकार्यासाठी विचारणा केली तर मी आनंदाने सहकार्य करीन. मागील चार वर्षेपर्यंत काँग्रेस सरकारशी मी माझ्या सर्व सामर्थ्यानिशी प्रामाणिकपणे माझ्या मातृभूमीची सेवा करण्यात सहकार्य केले. परंतु या संपूर्ण काळाच्या दरम्यान काँग्रेस संघटनेत मी विरून जाण्यापासून स्वतःला अलिप्त राखले आहे. जे लोक आपल्या शब्दाशी व कर्तृत्वाशी प्रामाणिक राहून अस्पृश्यांच्या कार्यात मदत करू इच्छितात त्यांच्याशी मी आनंदाने सहकार्य करून त्यांना मदत करेन. जे केवळ गोडबोले व गोड गोड थापा मारणारे आहेत परंतु ज्यांचा अंतस्थ हेतू आणि कृती आमच्या लोकांच्या हिताच्या विरोधी असते त्यांना मी कदापिही मदत करणार नाही." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.

दि. २७ ऑक्टोबर १९५१, जालंदर येथे पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी केलेल्या भाषणातून.
**********************************
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)

धर्मास ग्लानी का येते?

"मिलिंदाने असा प्रश्न विचारला की धर्मास ग्लानी का येते? नागसेनाने त्याचे उत्तर देऊन त्याची तीन कारणे सांगितली-
पहिले कारण हे की एखादा धर्मच कच्चा असतो. त्या धर्माच्या मूळ तत्त्वांत गांभीर्य नसते. तो कालिक धर्म बनतो व काळापुरता अशा धर्म टिकतो.

दुसरे कारण हे की धर्म प्रचार करणारे विद्वान लोक नसतील तर धर्म ग्लानी होते. ज्ञानी माणसांनी धर्मज्ञान सांगितले पाहिजे. विरोधकांशी वादविवाद करण्यास धर्माचे प्रचारक सिद्ध नसतील तर धर्माला ग्लानी येते.

आणि तिसरे कारण हे की धर्म व धर्माची तत्त्वे विद्वानांसाठी असतात. प्राकृत व सामान्य लोकांकरिता मंदिरे-देवळे असतात. ते तेथे जाऊन आपल्या श्रेष्ठ विभूतीचे पूजन करतात.

आपण बौद्ध धर्म स्विकारतांना ही कारणे लक्षात ठेवली पाहिजे. बौद्ध धर्माची तत्त्वे कालिक, काही काळापुरती आहेत असे कोणासही म्हणता यावयाचे नाही. आज अडीच हजार वर्षांनंतरही बुद्धांची सारी तत्त्वे सर्व जग मानते. अमेरिकेमध्ये बुद्धाच्या दोन हजार संस्था आहेत. इंग्लंडमध्ये तीन लाख रुपये खर्च करून बौद्ध मंदिर बांधण्यात आले आहे. जर्मनीतही तीन-चार हजार बुद्ध संस्था आहेत. बुद्धाची तत्वे अजरामर आहेत. तथापि बुद्धांनी असा दावा केला नाही की हा धर्म ईश्वराचा आहे. बुद्धांनी सांगितले माझे वडील प्राकृत होते; माझी आई प्राकृत बाई होती. हा धर्म तुम्हाला वाटेल तर घ्यावा. हा धर्म जेव्हा तुमच्या बुद्धीला पटेल तेव्हा तो तुम्ही स्वीकारा. एवढी उदारता दुसऱ्या कोणत्याही धर्मात सांगितलेली नाही." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.

दि. १५ ऑक्टोबर १९५६, नागपूर. धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यातील भाषणातून.

Cost of Education

*Dr. Ambedkar in the Bombay Legislature:*
ON GRANTS FOR EDUCATION, 12th March 1927

"Going over the figures which give us information as to the manner by which we finance education in this presidency, I find that out of the total expenditure which we incur on arts colleges, something like 36% is financed from fees; out of the expenditure that we incur on high schools something like 31% is financed from fees; out of the expenditure that we incur on middle schools, something like 26% is derived from fees. Now, Sir, I submit that this is commercialisation of education. Education is something which ought to be brought within the reach of everyone. The education department is not a department which can be treated on the basis of 'quid pro quo'. Education ought to be cheapened in all possible ways and to the greatest possible extent. I urge this plea because I feel that we are arriving at a stage when the lower orders of society are just getting into the high schools, middle schools and colleges, and the policy of this department therefore ought to be to make higher education as cheap to the lower classes as it can possibly be made." ~Dr. Babasaheb Ambedkar

DBAWS, Vol. 2