नैसर्गिक गुण व सानुकूल परिस्थिती ही उन्नतीची आद्य कारणे

 *"आपल्या लोकात आपल्या उन्नतीबद्दल दिसून येत असलेली कळकळ अपूर्व आहे." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर*

(दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची पहिली परिषद, माणगाव, संस्थान कागल- दिवस पहिला. ~याच माणगावच्या परिषदेत दुसऱ्या दिवशी राजर्षी शाहू महाराजांचे भाषण झाले.)

"ही परिषद अनेक दृष्टींनी अपूर्व आहे. मुंबई इलाख्यातील परिषदेचा हा तसा पहिलाच प्रसंग आहे व आपल्या लोकात आपल्या जातीबद्दल दिसून येत असलेली कळकळ ही देखील तितकीच अपूर्व आहे. त्याचप्रमाणे बहिष्कृत वर्गात दिसून येत असलेली विचारक्रांतीही तशीच अपूर्व आहे. आजवर आपल्या लोकास वाटत होते की आपली वाईट स्थिती होण्याचे कारण आपले दुर्भाग्य होय आणि दुर्भाग्याला आळा घालणे आपल्या हाती नसल्याकारणाने आहे ती बिकट स्थिती आपण निमूटपणे सोसली पाहिजे. हल्लीच्या पिढीला मात्र आपली परिस्थिती ईश्वरी लीलेचा परिपाक आहे असे वाटत नसून ती इतरांच्या दुष्कृत्यांचा परिणाम आहे असे वाटू लागले आहे.

ज्या हिंदू धर्माचे आपण घटक आहोत त्या हिंदू धर्माच्या व्यवहारात मनुष्यमात्राचे संघटन दोन आदितत्त्वांना धरून झालेले दृष्टीस पडते. एक जन्मसिद्ध योग्य-अयोग्यता व दुसरी जन्मसिद्ध पवित्र-अपवित्रता. या दोन तत्त्वांनुरूप हिंदू लोकांची विभागणी केली तर त्याचे तीन वर्ग होतात. १.जन्माने सर्वात श्रेष्ठ व पवित्र ज्याला आपण ब्राह्मण वर्ग असे म्हणतो तो. २.ज्यांची जन्मसिद्ध श्रेष्ठता व पवित्रता ब्राह्मणापेक्षा कमी दर्जाची आहे असा जो वर्ग तो ब्राह्मणेतर वर्ग ३.जे जन्मसिद्ध कनिष्ठ व अपवित्र अशांचा जो तो आपला बहिष्कृत वर्ग होय. अशारीतीने वर्गीकरण करून धर्माने ठरवून दिलेल्या श्रेष्ठतेच्या व पवित्रतेच्या विषम प्रमाणांचा या तीन वर्गांवर परिणाम झाला आहे. *जन्मसिद्ध श्रेष्ठतेमुळे व  पवित्रतेमुळे गुणहीन ब्राह्मणांचे देखील कल्याण झाले आहे.* ब्राम्हणेतरास जन्मसिद्ध अयोग्यतेचा मारा आहे. त्यांच्यात विद्या नाही म्हणून ते आज मागे राहिले आहेत. तरीपण विद्या व द्रव्य मिळविण्याचे मार्ग त्यांना मोकळे आहेत. ही दोन्ही जरी त्यांच्याजवळ आज नसतील तरी त्यांना ती उद्या मिळणार आहे. आपल्या बहिष्कृत वर्गाची स्थिती मात्र जन्मसिद्ध अयोग्यतेमुळे व अपवित्रतेमुळे फारच शोचनीय झाली आहे. अनेक दिवस अयोग्य व अपवित्र मानून घेतल्यामुळे *नैतिकदृष्ट्या आपल्यातील आत्मबल व स्वाभिमान ही जी उन्नतीची आद्य कारणे* ती अगदी लोपून गेली आहेत. सामाजिकदृष्ट्या हिंदू धर्माप्रमाणे त्यांना हक्क नाहीत. त्यांना शाळेत जाता येत नाही. सार्वजनिक विहिरीवर पाणी भरता येत नाही व रस्त्यावर चालता येत नाही. वाहनाचा उपयोग करून घेता येत नाही. इत्यादी प्रकारच्या कनिष्ठ हक्कांनादेखील ते दुरावले आहेत. जन्मसिद्ध अयोग्यतेमुळे व अपवित्रतेमुळे आर्थिकदृष्ट्या त्यांचे तितकेच नुकसान झाले आहे. व्यापार, नोकरी व शेती हे जे धनसंचयाचे तीन मार्ग आहेत ते त्यांना खुले नाहीत. विटाळामुळे गिर्‍हाईक मिळत नसल्याकारणाने त्यांना व्यापार करण्याची सोय उरली नाही. शिवाशिवीमुळे त्यांना नोकरी मिळत नाही व कधीकधी गुणाने योग्य असूनही खालच्या जातीचे असल्यामुळे इतर लोक त्यांच्या हाताखाली नोकरी करण्यास कचरतात. म्हणून त्यांना नोकरी मिळणे जड जाते. याच भावनेमुळे मिलिटरीतून त्यांचा उठाव झाला आहे. शेतीच्या बाबत त्यांची तीच दशा आहे. अशा हाडकी हडवळ्यापेक्षा भुईचा तुकडा विशेष कोणाला आहे? 
 
अशाप्रकारे नाडलेल्या समाजाची उन्नती होणार नाही. *नैसर्गिक गुण व सानुकूल परिस्थिती ही दोन उन्नतीची आद्य कारणे आहेत. बहिष्कृत वर्गात नैसर्गिक गुणांची वाण नाही हे सर्वांस मान्य आहे. परंतु त्यांचा विकास होत नाही याचे मूळ कारण त्यांना परिस्थिती सानुकूल नाही हे होय.* परिस्थिती सानुकूल करून घेण्यास अनेक उपाय सुचविले जातात; परंतु याकरिता आपण राजकीय सामर्थ्य संपादिले पाहिजे व जातवार प्रतिनिधित्व मिळाल्याशिवाय आपल्या हाती राजकीय सामर्थ्य येणार नाही. "सत्यमेव जयते" हे तत्त्व पोकळ आहे. सत्याचा जय होण्यास आपण आपली चळवळ कायम ठेवली पाहिजे." ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर


माणगाव, 21 मार्च 1920
**********
मूकनायक: 10 एप्रिल 1920
**********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग १)

No comments:

Post a Comment

Suggestions are most welcome