विद्यार्थ्यांनी निरंतर ज्ञानार्जन हेच ध्येय ठेवावे

"विद्यार्थीदशेत ज्ञानार्जन चालू असता विद्यार्थ्यांनी आपल्यापुढे निरंतर "ज्ञानार्जन" हे एकच ध्येय ठेवावे. विद्यार्थीदशा परत प्राप्त होणार नाही. या अवधीत प्रयत्नांची परमावधी करून ज्ञान संपादन करावे. समाजसेवेस पुढील आयुष्यात विपुल काळ आहे. विद्यार्थिदशेत व्याख्यान देऊन समाजाचे होणारे तात्कालिक हित हे पूर्ण ज्ञान संपादन झाल्यानंतर अनेक प्रकारे अधिकार प्राप्तीने सेवा करता येऊन समाजाचे जे हित साधता येईल त्या हितापेक्षा शतपटीने हिणकस आहे. या तत्त्वांची पूर्ण जाणीव ठेवून शिक्षण प्राप्ती हेच आपले सध्याचे ध्येय ठेवावे."  ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.

दि. १० सप्टेंबर १९३२, दामोदर हॉल, परळ, मुंबई

बुद्ध तत्त्वज्ञानामुळेच जग युद्धापासून दूर व शांततेच्या जवळ जाईल

"जगापुढे, विशेषतः आशिया खंडापुढे आज दोनच मार्ग उपलब्ध आहेत. एक बुद्धाचा मार्ग व दुसरा मार्क्सचा मार्ग. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा वेळीच जगाने स्वीकार केला नाही तर कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाचा विजय होणे अपरिहार्य आहे. बुद्धाचे तत्त्वज्ञान हाच जगाला एकमेव आधार आहे व त्याचा जेवढा प्रचार होईल तेवढे जग युद्धापासून दूर व शांततेच्या नजीक जाईल."  ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
दि. १५ फेब्रुवारी १९५३, नवी दिल्ली.

बौद्ध धर्म पुन्हा या देशाचा धर्म होईल

"बुद्ध या देशात 80 वर्षे जगला. या देशात त्याने आपल्या आयुष्याची 45 वर्षे प्रचारात घालविली. आज जशी शंकराचार्याला मोटार आहे तशी त्याच्याजवळ मोटार नव्हती. साधा गाडीघोडाही नव्हता. वाहतुकीचे एकही साधन त्याला उपलब्ध नव्हते. तरीपण देश-कल्याणाकरिता तो जम्मुपासून कन्याकुमारीपर्यंत अक्षरशः पाणी फिरला. बाराशे वर्षांपर्यंत बुद्धधर्म या देशात चालू होता. ज्याने भिक्षा मागून आपले जीवन जगविले, अनंत हाल सोसले, त्याचे नावही या देशात निघत नाही.
केव्हा केव्हा खोट्याचा जय होतो, खर्‍याचा जय होत नाही. तसाच काहीसा हा प्रकार आहे. पण सर्वांनी ध्यानात ठेवावे की सत्याचाही केव्हातरी जय होईलच. आणि आज ती वेळ आली आहे. बाराशे वर्षांचा धर्म पुनरपि या देशाचा धर्म होईल, अशी माझी खात्री आहे." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.

दि. १४ जानेवारी १९५१, वरळी, मुंबई येथील बुद्धदूत सोसायटीच्या विद्यमाने भरविण्यात आलेल्या बुद्धमेळ्यात केलेल्या भाषणातून.

जाती मोडण्यासाठी बौद्ध धर्माचा स्वीकार हाच एक उपाय

"धर्म शुद्ध तत्त्वावर आधारित असला पाहिजे. बुद्धाचा वर्णाश्रम पद्धतीवर कधीच विश्वास नव्हता. 'आपण सर्व सारखेच आहोत' ही गोष्ट आपण कधीच विसरता कामा नये. माणसा-माणसात कसलाच भेदभाव नाही. जन्माने उच्च नीच कोणीच असू शकत नाही. उच्चनीचता करणीने प्राप्त होते. या गोष्टी बुद्धाने सांगितल्या आहेत. जर लोक पुन्हा बुद्धाचा अंगीकार करतील तर हा देश पुन्हा वैभवाप्रत गेल्यावाचून राहणार नाही. एरव्ही दुसऱ्या कोणत्याही मार्गाने जातीभेद जाणे शक्य नाही. परंतु खरोखरच कोणाला जाती मोडायच्या असतील तर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करावा; हाच एक उपाय आहे." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
 
दि. २० मे १९५१, नवी दिल्ली येथे बुद्ध जयंतीला केलेल्या भाषणातून.

बौद्ध धर्माचा भारतातील प्रादुर्भाव व फ्रान्सची राज्यक्रांती या महत्त्वाच्या घटना

"बौद्ध धर्माचा भारतातील प्रादुर्भाव व फ्रान्समधील राज्यक्रांती या दोन्ही युगांतकारी महत्त्वपूर्ण घटना आहेत. बौद्ध धर्माच्या उदयापूर्वी एखादा शूद्र राजा होऊ शकेल ही कल्पनाही करता येण्यासारखी नव्हती. परंतु भारतीय इतिहासाच्या तज्ञांना हे माहीत आहे की बौद्ध धर्माच्या प्रादुर्भावानंतर शूद्रांनाही सिंहासनावर बसण्याची संधी प्राप्त झाली आणि देशात सामाजिक समतेची स्थिती निर्माण झाली. गणतंत्रीय राज्यपद्धती ही बौद्ध काळाचीच देणगी आहे. भगवान बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर इ. पू. २७४ पर्यंत बौद्ध धर्माची स्थिती कशी होती हे जाणून घेण्याची पर्याप्त साधने उपलब्ध नाहीत. तथापि अशोकाच्या काळात बौद्ध धर्माचा प्रसार विजेच्या गतीने झाला. अशोक आणि चंद्रगुप्तासारखे बलाढ्य सम्राट बौद्ध काळातच झाले आहेत व यांनीच भारताबाहेरील राज्यांशी मैत्रीचे संबंध स्थापित केले होते. बौद्ध काळात भारतामध्ये स्थापत्यकला, चित्रकला, मूर्तीकला, इत्यादी नाना प्रकारच्या कलांचा विकास झाला. बौद्ध काळात साहित्य आणि तत्त्वज्ञानाची इतकी भरभराट झाली होती की अनेक देशांतील विद्यार्थी येथील नालंदा व तक्षशिला विश्वविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी दाखल झाले. त्यापूर्वी कधीही असा गौरव भारताला प्राप्त झाला नव्हता." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
 
दि. ६ जून १९५०, कोलंबो येथे वाय. एम. बी. ए. कोलंबो द्वारा आयोजित 'विश्व बौद्ध भ्रातृत्व सम्मेलनात' केलेल्या भाषणातून.

तत्त्व आणि व्यवहाराची सांगड घालण्याची जबाबदारी

"स्वातंत्र्य, समता व भ्रातृभाव यांच्या आपण खूप गप्पा मारतो. नव्हे, या त्रयीवर आपण व्याखानेही झोडू शकतो. परंतु या तिन्हीपैकी एकतरी आपल्या भारतीय समाजात बसत आहे की नाही याचा विचारही आपण करीत नाही. जणू काही तत्त्वांची आणि व्यवहाराची सांगड घालण्याची आपणावर काहीच जबाबदारी नसल्याचे वाटते.
 
भारतामध्ये बहुसंख्य जनता अज्ञान आणि भोळसर खुळ्या कल्पनेत गुरफटून गेली आहे. नव्हे, येथील समाजरचनाच खुळ्या कल्पनांना जन्म देते. म्हणून उपास-तापास, नवस-सायास, देव-देवऋषी करणे म्हणजे धर्म पालन करणे अशी लोकांची भावना झालेली आहे. या खुळ्या आणि धर्मभोळ्या जनतेची या कल्पनेतून सुटका करावयास पाहिजे. विद्यार्थ्यांनी चाळी-चाळीत जाऊन जनतेचे अज्ञान आणि खुळ्या समजुती दूर केल्या पाहिजेत. तरच आपल्या शिक्षणाचा जनतेला काहीतरी लाभ होईल. आपण आपल्या ज्ञानाचा केवळ परीक्षा पास करण्यासाठी उपयोग करून चालणार नाही. ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या बांधवांची सुधारणा व प्रगती करण्याकरिता केला पाहिजे. तरच भारत उन्नतावस्थेला जाईल.

जगातील अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सुटलेले नाहीत. ते सोडविण्याचा मानव सारखा प्रयत्न करीत आहे. त्यासाठीच निरनिराळे सिद्धांत पुढे मांडण्यात येतात. कार्ल मार्क्स आज आपणापुढे खरा प्रश्न आहे. आजचे प्रश्न सोडविण्यास मार्क्सच्या विचारसरणीऐवजी दुसरी एखादी प्रभावी विचारसरणी उपयोगी पडेल काय? हाच आजच्या काळाचा प्रश्न आहे. आपले सारे प्रश्न सोडविण्यास कार्ल मार्क्सचे सिद्धांत समर्थ ठरतील की नाही हीच आजची समस्या आहे. ही समस्या आजच्या पिढीने शक्य तितक्या लवकर सोडविली पाहिजे." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
 
दि. २ मे १९५४, सिद्धार्थ कॉलेज, मुंबई येथील यूथ असेंब्लीच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणातून 
**********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)

शिक्षण व विद्या या गोष्टींशिवाय आपला उद्धार होणार नाही

"शिक्षण व विद्या या गोष्टींशिवाय आपला उद्धार होणार नाही. मी माझ्या आयुष्यात अनेक कार्ये अंगीकारली. राजकारणात माझा विशेष महत्त्वाचा काळ गेला. सध्या राजकारणाच्या दोऱ्या उच्चवर्णीयांच्या हातात आहेत. त्या दोऱ्या तशाच हाती ठेवण्यासाठी उच्चवर्णीयांची धडपड चाललेली आहे. उच्च प्रतीच्या माऱ्याच्या जागा पटकावण्यासाठी जी विद्या पाहिजे ती अजून उच्चवर्णीयांखेरीज इतरांना प्राप्त झालेली नाही. "जिच्या हाती पाळण्याची दोरी..." असे काही म्हटले जाते, त्याचप्रमाणे राजकारणाच्या दोर्‍या विद्येशिवाय आपल्या हाती येणार नाहीत. राजकीय सत्ता हाती यावी म्हणून अनेकांनी प्रयत्न चालविले आहेत, पण त्यांना यश येत नाही. या तफावतीचे अधिष्ठान हेच आहे. इंजिनिअर, कलेक्टर वगैरे जागा फक्त उच्चवर्णीयांनाच शिक्षणामुळे मिळतात. शंभर पैकी जवळजवळ ९९ इंजिनिअर, ९९ कलेक्टर असे उच्चवर्णीयांचे असतात. त्यामुळे त्यांच्या हाताखालील जागा ते आपल्या लोकांना देत असतात." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
दि. १४ जानेवारी १९४८, धोबी तलाव नाईट स्कूल, मुंबई

माझा स्वराज्याला बिलकूल विरोध नाही पण त्या स्वराज्यात आम्हाला पुरेसा हिस्सा पाहिजे

"माझा स्वराज्याला बिलकूल विरोध नाही. पण त्या स्वराज्यात आम्हाला पुरेसा हिस्सा पाहिजे. अधिकाराच्या व माऱ्याच्या जागी आमची माणसे हक्काने आली पाहिजे. गोलमेज परिषदेमध्ये स्वतंत्र मतदार संघासाठी मी भांडलो. स्पृश्यांनी निवडलेली माणसे आम्हाला प्रतिनिधी नकोत म्हणून मी आग्रह धरला. अखेर मी विजयी झालो व स्वतंत्र मतदारसंघ मिळविला. पण गांधींना पोटदुखी उठली. अस्पृश्यांना स्वाभिमानाचे हक्क जे मिळाले ते दुष्टपणाने हिरावून घेण्यासाठी त्यांनी आमरण अन्नसत्याग्रह केला व आपले हक्क हिरावून घेतले. त्यामुळे आपल्याला फारच कमी हक्क मिळाले. आपल्या बुरुजाला जी भेग पाडली आहे तीत संघटनेचा चुना वगैरे घालून आपण ती भरून काढली पाहिजे. आपले सरकारी अधिकारी पाहिजेत, मंत्री पाहिजेत, मध्यवर्ती सरकारातही मंत्री पाहिजेत. असे असता सात प्रांतात काँग्रेस मंत्रिमंडळे झाली, पण गांधींचा दृष्टिकोन बदलला नाही किंवा त्यांच्या हृदयात पालटही झाला नाही. परवा गांधींनी मद्रासचा दौरा काढला. तेथे अस्पृश्यांची व तुमची एवढी तेढ का? असा एकाने प्रश्न केला, तेव्हा सरळ व स्पष्ट उत्तर न देता गांधींनी काहीतरी उडवाउडवीचे उत्तर दिले व इंग्रजांनी यांना अधिकाराची चटक लावली असे उद्गार काढले. मराठे, मुसलमान, तसेच ख्रिश्चन, ॲंग्लो इंडियनांना नोकऱ्या देतात त्याबद्दल गांधींचे काही म्हणणे नाही. फक्त अस्पृश्यांना दिल्या की त्यांच्या पोटात दुखते असा अनुभव आहे." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
दि. १५ फेब्रुवारी १९४६, दहिवडी, सातारा.

आमच्या सर्व सामाजिक दुखण्यांवर उच्च शिक्षण हेच औषध

"हिंदू समाजाच्या अगदी खालच्या थरातून आल्यामुळे शिक्षणाचे किती महत्त्व आहे हे मी जाणतो. खालच्या समाजाची उन्नती करण्याचा प्रश्न आर्थिक असल्याचे मानण्यात येतेे. पण ही मोठी चूक आहे. हिंदुस्थानातील दलित समाजाची उन्नती करणे म्हणजे त्यांच्या अन्न, वस्त्र व निवारा यांची सोय करून पूर्वीप्रमाणेच त्यांना उच्च वर्गाची सेवा करावयास लावणे नव्हे. खालच्या वर्गाची ज्याच्यामुळे प्रगती खुंटून त्यांना दुसऱ्याचे गुलाम व्हावे लागते तो न्यूनगंड त्यांच्यातून नाहीसा करणे, चालू समाजपद्धतीमुळे जे त्यांचे जीवन निर्दयपणे लुबाडण्यात आले आहे त्याचे त्यांच्या स्वतःच्या आणि राष्ट्राच्या दृष्टीने काय महत्त्व आहे याची त्यांना जाणीव करून देणे हाच खालच्या वर्गाचा प्रश्न आहे. उच्च शिक्षणाच्या प्रसाराखेरीज कशानेच हे साध्य होणार नाही. आमच्या सर्व सामाजिक दुखण्यांवर, माझ्या मताप्रमाणे, हेच औषध आहे." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
दि. १ सप्टेंबर १९५१, औरंगाबाद येथील मिलींद महाविद्यालयाच्या इमारतीची कोनशिला बसविण्याच्या प्रसंगी केलेल्या ऐतिहासिक भाषणातून.

Volume- 7 : 1. Who were the Shudras and 2. The Untouchables

Dr. Babasaheb Ambedkar Writings and Speeches -Volume- 7 : 

*1. WHO WERE THE SHUDRAS? How They Came to be The Fourth Varna in The Indo- Aryan Society
*2. THE UNTOUCHABLES: Who Were They and Why They Became Untouchables

(Contents)
**************************************************************
BOOK 1- 

Who were the Shudras? How they came to be the fourth varna in the Indo-Aryan Society?

I. The Riddle of The Shudras
II. The Brahmanic Theory of The Origin of The Shudras
III.The Brahmanic Theory of The Status of The Shudras
IV. Shudras Versus Aryans
V. Aryans against Aryans
VI. Shudras and Dasas
VII. The Shudras were Kshatriyas
VIII.The number of Varnas, Three OR Four?
IX. Brahmins versus Shudras
X. The Degradation of the Shudras
XI. The Story of Recociliation
XII. The Theory in the Crucible

APPENDICES: I to VI
MAPS: I to IV 

******************
BOOK 2- 

The Untouchables: Who Were They and Why They Became Untouchables?

Part I: A Comparative Survey
1. Untouchability among Non- Hindus
2. Untouchability among Hindus

Part II: Problem of Habitat
3. Why do the Untouchables live outside the village
4. Are the Untouchables Broken Men?
5. Are there parallel cases?
6. How did separate settlements for Broken men disappear elsewhere?

Part III: Old Theories of the Origin of Untouchability
7. Racial difference as the origin of Untouchability
8. Occupational origin of Untouchability

Part IV: New Theories of The Origin of Untouchability
9. Contempt for Buddhists as the root of Untouchability
10. Beef-eating as the root of Untouchability

Part V: The New Theories and some hard Questions
11. Did the Hindus Never Eat Beef?
12. Why did Non-Brahmins give up beef-eating?
13. What made the Brahmins become Vegetarians?
14. Why should beef-eating make broken men untouchables?

Part VI: Untouchability and the death of its Birth
15. The Impure and the Untouchables
16. When did Broken men Become Untouchables?

 
INDEX

धर्माच्या नावावर जमविलेल्या पैशाचा विनियोग

"धर्माच्या बाबतीत आपण चुकीच्या मार्गाने गेलो आहोत, एवढेच नव्हे तर आजकालच्या काळात धर्माच्या नावावर पैसा गोळा करून तो अनिष्ट बाबींवर खर्च केला जातो. आज जगात दारिद्र्य आणि दुःख असताना अशारितीने धर्माच्या नावावर पैसा जमवून तो ब्राम्हणादि आणि उत्सवावर खर्च करणे हा एक भयंकर गुन्हा आहे. गौतम बुद्धांनी हा प्रश्न व्यवस्थितपणे हाताळला होता. त्यांनी आपल्या नैतिक शास्त्रात पंचशील, अष्टांग मार्ग आणि निर्वाण फार उत्कृष्ट रीतीने सांगितले आहेत. याशिवाय त्यांनी आपल्या अनुयायांना खालील दहा तत्त्वे आत्मसात करण्यास सांगितली आहेत. ती अशी: (१) प्रज्ञा, (२) शील, (३) नेखम्म, (४) दान, (५) वीर्य, (६) खन्ति, (७) सच्च, (८) अधित्थान, (९) मैत्री, (१०) उपेक्खा.

ज्यामुळे अज्ञानांधकार नाहीसा होतो ती प्रज्ञा म्हणजे ज्ञानरूपी प्रकाश; शील म्हणजे नैतिक विचार; कोणतीही वाईट गोष्ट करू नये, परंतु चांगली गोष्ट मात्र सतत करीत राहावे. नेखम्म म्हणजे ऐहिक सुखापासून अलिप्त राहणे. दान म्हणजे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता दुसऱ्यासाठी तन-मन-धन अर्पण करणे. वीर्य म्हणजे धैर्य, कसोटी की ज्यामुळे हाती घेतलेल्या कामात कधी माघार न घेणे. खन्ति म्हणजे सहनशीलता. द्वेषाला द्वेषाला उत्तर न देणे. सच्च म्हणजे सत्य. प्रत्येकाने खोटे कधी बोलू नये. सत्य बोलावे. जे बोलावे ते सत्यच असावे. अधित्थान
म्हणजे मनोनिग्रह. मैत्री म्हणजे प्रेम. मग ती मित्राविषयी असो किंवा शत्रूविषयी असो. मानवाविषयी असो किंवा इतर प्राणीमात्राविषयी असो. उपेख्खा म्हणजे उपेक्षा, ज्यामुळे मन सुखदुःखाच्या पलीकडे गेले असून कोणत्याही परिणामाने विचलित न होता कर्तव्यपरायण राहणे. वरीलपैकी जास्तीत जास्त गुण प्रत्येक माणसाने आत्मसात करावे अशी बुद्धाची अपेक्षा होती. म्हणूनच पाली वाङ्मयात असे म्हटले आहे की गौतम बुद्धांनी वरीलप्रमाणे "दान पारमिता" जरी शिकविली असली तरी दान हे सत्पात्री असण्याबद्दल त्यांचा कटाक्ष होताच. देण्यासाठी दाता जरी प्रवृत्त झाला तरी त्यामुळे ज्याला दान दिले जाते त्याला मात्र त्याने कमीपणा येता कामा नये. पददलितांना एक दिवस स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सामर्थ्य निर्माण करणारी शक्ती जिला आपण मदत म्हणतो तेच खरे दान. साधुसंतांच्या नावावर पैसा जमा केला असेल तर त्याचा पारमिता मध्ये सांगितलेल्या तत्त्वाप्रमाणे विनियोग करणे अत्यंत आवश्यक आहे. दारिद्र्य, अज्ञान, रोगराई इतकी आहे की सध्याच्या काळात ती नष्ट करण्यासाठी असा पैसा खर्च न करता तो धनिकांसाठी खर्च करणे म्हणजे दुष्टपणा ठरेल. त्या पैशाचा विनियोग रुग्णालये, शिक्षण, बेकारांसाठी छोटे छोटे धंदे, गरीब व अनाथ महिलांसाठी काहीतरी धंदे-शिक्षण देणे, अशा कार्यावर त्यांनी करावा. आपण जर जमा केलेल्या पैशाचा विनियोग अशा रीतीने केला तर त्यामुळे आपल्या कार्याची वाहवा होईल." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
दि. २४ जानेवारी १९५४, झेवियर कॉलेजचे मैदान, अखिल भारतीय साई भक्त संमेलन

मी एक बौद्ध धर्माचा उपासक आहे

"मी एक बौद्ध धर्माचा उपासक आहे. मी नुसताच बोध घेतलेला नाही व नुसते बोलतो असे नाही, तर प्रत्यक्ष कृती करून दाखवीन. माझे आयुष्याचे शेवटचे दिवस आता बुद्ध धर्माच्या प्रचारातच खर्च करण्याचे मी निश्चित ठरविले आहे. मी हे बुद्ध धर्म प्रचाराचे शेत पेरणार आहे व त्यात कोणते पीक येते हे पाहणार आहे." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
दि. २७ मे १९५३, बुद्ध जयंती, नरे पार्क, परेल.

धर्माची आवश्यकता गरिबांना आहे

"धर्माची आवश्यकता गरिबांना आहे. पीडित लोकांना धर्माची आवश्यकता आहे. गरीब मनुष्य जगतो तो आशेवर. जीवनाचे मूळ आशेत आहे. आशाच नष्ट झाली तर जीवन कसे होईल? धर्म आशादायी बनवितो व पीडितांना, गरिबांना संदेश देतो: "काही घाबरू नकोस. होईल, जीवन आशादायी होईल." म्हणून गरीब व पीडित मनुष्यमात्र धर्माला चिकटून राहतो ." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
दि. १५ ऑक्टोबर १९५६, दीक्षाभूमी नागपूर येथील दीक्षामंडपातील ऐतिहासिक भाषणातून.