समाजाचे 'राज्यकर्ते व सामान्य जनता'असे वर्ग पडतात हे दुर्दैव

 *"सर्व राजकीय समाजाचे 'राज्यकर्ते व सामान्य जनता' असे वर्ग पडतात हे दुर्दैव आहे." ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर* (१९४३)
*********
दि. १७ सप्टेंबर १९४३, दिल्ली येथे 'द इंडियन फेडरेशन ऑफ लेबर' या संस्थेच्या विद्यमाने आयोजित 'द ऑल इंडिया ट्रेड युनियन वर्कर्स स्टडी कॅम्प'च्या समारोपीय सत्रात बाबासाहेबांनी केलेल्या भाषणातून...
*****
"सर्व राजकीय समाजाचे 'राज्यकर्ते व सामान्य जनता' असे वर्ग पडतात हे दुर्दैव आहे. एवढ्यावरच हे थांबते तर हरकत नव्हती, पण त्याच्यावर ताण म्हणजे हे दोन तट इतके कायम राहतात, की समाजाच्या एका विशिष्ट घटकातूनच राज्यकर्ते निवडले जातात, सर्वसाधारण जनता तशीच राहते. जनता स्वतः राज्य करीत नाही, ती फक्त शासनसंस्था स्थापन करते आणि त्यापुढे त्यापासून अलिप्त राहते आणि ते राज्य आपले राज्य आहे हे विसरते. असे झाल्यामुळे पार्लमेंटरी लोकशाही जनतेचे राज्य कधीच स्थापू शकली नाही. थोडक्यात म्हणजे जनतेच्या राज्याचे बाह्य अवडंबर असूनही वस्तुतः ते एका वर्गाचे दुसऱ्या वर्गावर परंपरागत चालणारे राज्य झाले आहे‌. या दोषांमुळेच पार्लमेंटरी लोकशाही अयशस्वी ठरली आणि जनतेची सौख्याची आशा पूर्ण करू शकली नाही.

मग प्रश्न असा उभा राहतो, की याला जबाबदार कोण? गरीबगुरीब, कामगार व इतर दलित जनता यांचे पार्लमेंटरी लोकशाहीने हित केले नाही हे खरे. पण त्याला तेच मुख्यतः जबाबदार आहेत. आपण असे बघा, की मानवी जीवनाचा पाया आर्थिक आहे हे तेच विसरले नाहीत का? मी नुकतेच 'आर्थिक मानवाचा मृत्यू' या नावाचे पुस्तक बघितले. पण आर्थिक मानवाचा अजून जन्मच झाला नाही, तर त्याच्या मृत्यूचा प्रश्नच येत नाही. नुसत्या अन्नावरच मनुष्य जगत नसतो हा मार्क्सच्या टीकाकारांनी त्याला दिलेला टोमणा दुर्दैवाने खरा आहे. या मानवाने नुसते डुकरासारखे लठ्ठ होणे हे संस्कृतीचे ध्येय नाही हे कार्लाइलचे म्हणणे मला पटते. पण कामगार लठ्ठ होण्याचे तर दूरच राहो, त्यांना पोटभर देखील अन्न मिळत नाही. मी तर असे म्हणेन, की सर्व सोडून अन्नाचाच विचार कामगारांनी प्रथम केला पाहिजे.

मानवी जीवनाचा पाया आर्थिक आहे आणि म्हणून आर्थिक परिस्थितीप्रमाणे इतिहास घडत असतो ही विचारसरणी मार्क्सने जगाच्या पुढे ठेवल्यापासून त्यावर वाद झाले आहेत. पण माझ्या मते त्याने हे तत्त्व म्हणून ही विचारसरणी मांडली नसून त्यायोगे कामगारांना शिकवणूक दिली, की ज्याप्रमाणे वरिष्ठ वर्ग आर्थिक बाबींना महत्त्व देतात त्याचप्रमाणे कामगारांनी दिल्यास इतिहास म्हणजे आर्थिक जीवनाचे प्रतिबिंब होईल. मार्क्सचे तत्त्व खरे असलेले आपल्याला वाटत नाही याचे कारणच मुळी हे, की आर्थिक परिस्थितीचा समाजरचनेवर जो परिणाम होतो त्याचे महत्त्व कामगारांनी लक्षात घेतले नाही. शासन पद्धतीविषयीचे वाङमय त्यांनी वाचले नाही. रुसोचे 'सामाजिक करार',  मार्क्सचा 'कम्युनिस्ट जाहीरनामा', पोप १३वा लिओचे 'कामगाराची स्थिती' आणि जॉन स्टुअर्ट मिलचे 'स्वातंत्र्य' ही समाज रचनेविषयीची चार मूलभूत पुस्तके कामगारांनी वाचलीच पाहिजेत. पण मला नक्की ठाऊक आहे, की कामगार त्यांना महत्त्व देणार नाहीत. त्यांनी राजाराणीच्या गोष्टी वाचण्याचा नाद आधीपासून लावून घेतला आहे."
~डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग २, 'शासनयंत्रणेचा ताबा घेणे कामगारांचे ध्येय असावे', पान क्र. ४३५-४४१)
********

शिक्षणाच्या अभावी माणूस जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम बनतो

 *"शिक्षणाच्या अभावी माणूस जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम बनतो." ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर* (जुलै १९२७)
*********
"उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस हीनबल होऊन अल्पायुषी होतो. तसेच शिक्षणाचे अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम बनतो. अर्थात, मुलांच्या शरिराची व बुद्धीची शक्य तेवढी चांगली जोपासना करणे हे प्रत्येक आईबापाचे कर्तव्य आहे. परंतु बऱ्याचशा लोकांच्या हातून शिक्षण देण्याचे महत्त्वाचे कर्तव्य पार पडत नाही. पोट हे दरेकाच्या मागे लागलेले असते व ते भरण्यास अनेक लोक अनेक प्रकारचे व्यवसाय करीत असतात. एकदा एक व्यवसाय पिढीजात झाला म्हणजे तोच पुढे चालू होतो; त्यात सहसा बदल होत नाही. या अनेक व्यवसायांपैकी शिक्षण हा एक व्यवसाय आहे व ज्या जाती त्यांत पडतात त्यांचा तो धंदा होऊन बसतो. ब्राह्मण लोक शिक्षण घेतात व इतर वर्ग घेत नाहीत याचे तरी कारण हेच की शिक्षण हा जसा ब्राह्मण जातीचा धंदा झाला आहे तसा तो इतर जातींचा झालेला नाही. तुम्ही शिक्षण घ्या म्हटले असता आम्हाला काय ब्राह्मण व्हायचे आहे, असे जे अब्राह्मण लोकांकडून उत्तर मिळते त्याचे इंगित यातच आहे. शिवाय अब्राह्मण लोकांत मुलाबाळांना शिक्षण देण्याची मनापासूनची इच्छा असली तरी ती सहज सफल होत नाही. मुलाला शाळेत घातले तर त्याचा दुहेरी बोजा आईबापांवर पडतो. एक तर मुलगा शाळेत गेला तर त्याच्यापासून होणारी कमाई बंद होते व तो आईबापांच्या अंगावर पोस पडतो. दुसरे, त्याच्या शिक्षणासाठी होणारा खर्च त्याच्या आईबापांस सोसावा लागतो. म्हणजे शिक्षणाच्या पायी कमाईची आयात बंद होऊन खर्चाच्या निर्गतीला मात्र सुरुवात होते. त्यामुळे हातावर कमवून जीवित कंठणाऱ्या आईबापांना खर्चाचा बोजा झेपत नाही व म्हणून त्यांची प्रजा पिढ्यानपिढ्या अज्ञानाच्या गर्तेत खितपत पडलेली असते." ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर.(१९२७)

********
अग्रलेख ("आप घरी बाटा, बाप घरीही बाटा!") : बहिष्कृत भारत, ता. १५ जुलै १९२७
********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १९, पान क्र. २१२-२१८)
********

सत्यशोधकी चळवळ म्हणजे समानतेची व सद्धर्माची चळवळ

 *"आम्हीही सत्यशोधकीच आहोत; सत्यशोधकी चळवळ म्हणजे, समानतेची व सद्धर्माची चळवळ." ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर* (बहिष्कृत भारत, ३ फेब्रुवारी १९२८)
*********

"आमच्या मित्रांना आमच्या चळवळीस सत्यशोधकी वळण लागेल याचे भय वाटत आहे. सत्यशोधकी चळवळ म्हणजे ब्राह्मणाचा द्वेष करणारी, राजकारणांत भाग न घेणारी, सरकारच्या नजरेकडे लक्ष ठेवून काम करणारी अशी आजपर्यंतची महाराष्ट्रांतील रुढ कल्पना आहे. व या कल्पनेंत समाविष्ट असलेले वळण अस्पृश्यांच्या चळवळीस न लागेल अशी खबरदारी घेण्याविषयी त्यांनी आम्हांस इशारा दिला आहे. आमच्या मित्रास आम्ही असे सुचवितो की, आम्हीही सत्यशोधकीच आहोत. व त्याबद्दल आम्हांस कोणत्याही तर्‍हेचा विषाद न वाटता उलट आनंदच वाटतो. *सत्यशोधकी चळवळ म्हणजे समानतेची व सद्धर्माची चळवळ असे आमचे ठाम मत आहे. इतकेच नव्हे तर दरेक स्वराज्यवाद्याने सत्यशोधकी असलेच पाहिजे असे आमचे ठाम मत आहे.* आमच्या मित्रांनी चालू सत्यशोधकी चळवळीवर जो आरोप केला आहे तो मात्र काही अंशी खरा आहे असे कबूल करणे प्राप्त आहे. परंतु हे वळण या चळवळीस का लागले याचा विचार आमच्या मित्रांनी जितका करावयास पाहिजे होता तितका केला नाही असे आम्हास म्हणावे लागते. सत्यशोधकी चळवळीला अशा प्रकारचे अनिष्ट वळण लागल्याचे मुख्य कारण म्हटले म्हणजे ब्राह्मण जातीचा त्या चळवळीस होणारा एकजात विरोध हेच होय. *ब्राह्मण जातीतील काही लोकांनी तरी सत्यशोधकी चळवळीने आपल्यापुढे मांडलेली समानतेची व सद्धर्माची तत्त्वे मान्य केली असती तर सत्यशोधकी चळवळीस ब्राह्मण द्वेषाचे भूत लागले नसते. किंवा तिच्या प्रसारार्थ तिला सरकारची कासही धरावी लागली नसती.* अशी परिस्थिती असल्याकारणाने आमच्या मित्रांस आमची अशी सूचना आहे की, त्यांनी सत्यशोधक व्हावे आणि आपल्या जातभाईसहि सत्यशोधक बनविण्याचा प्रयत्न करावा." ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर.(१९२८)

********
आजकालचे प्रश्न: बहिष्कृत भारत, ता. ३ फेब्रुवारी १९२८
********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १९, पान क्र. ३१८-३३२)
********

सर्वसाधारण जागेवर अस्पृश्य उमेदवार उभा करून कॉंग्रेसने आपला प्रांजळपणा सिद्ध करावा

 *"अस्पृश्य लोकांसंबंधीचा कॉंग्रेसचा हेतू प्रांजळ असेल तर ते सर्वसाधारण जागेवर अस्पृश्य उमेदवार उभा करून आपला प्रांजळपणा सिद्ध का करीत नाहीत?" ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
*********
ता. २७ ऑक्टोबर १९५१, जालंदर.
*****
"विभाजनानंतर पाकिस्तान सरकारने अस्पृश्यांना पाकिस्तानातून भारतात येण्यावर बंदी घालणारे एक फर्मान काढले. कितीही हिंदूंनी पाकिस्तान सोडले तरी पाक सरकारने त्यांची पर्वा केली नाही; परंतु अस्पृश्यांनी पाकिस्तान सोडले तर मैला वाहण्याचे, सडका झाडण्याचे, मेलेली जनावरे उचलण्याचे तिरस्करणीय जातीचे घाणेरडे धंदे कोण करणार होते? मी पं. नेहरूंना विनंती केली की या लोकांच्या स्थलांतर करण्यावर बंदी घालणारा हा आदेश काढून घेण्यासंबंधी काहीतरी कारवाई करा. परंतु त्यांनी काहीही केले नाही. या समस्येसंबंधी ते झोपी गेले आणि पाकिस्तानशी ज्या काही चर्चा वेळोवेळी झाल्या त्यावेळी त्यांनी या प्रश्नाचा प्रासंगिक उल्लेखही केला नाही. एकाकीपणे जेवढे मला करता येणे शक्य होते तेवढे मी केले आहे. महार बटालियनच्या शूर शिपायांनी गंभीर धोका पत्करून मला मदत केली आणि पाकिस्तानातून अनेक अस्पृश्य लोकांना आणले.

अशा स्थितीत आम्ही काँग्रेस पुढाऱ्यांच्या आश्वासनावर विश्वास कसा ठेवावा? अस्पृश्य लोकांसंबंधीचा कॉंग्रेसचा हेतू प्रांजळ असेल तर ते सर्वसाधारण जागेवर अस्पृश्य उमेदवार उभा करून आपला प्रांजळपणा सिद्ध का करीत नाहीत?" ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३, पान क्र. २५१)
********

बुद्ध तत्त्वज्ञानामुळेच जग युद्धापासून दूर व शांततेच्या जवळ जाईल

*"बुद्ध तत्त्वज्ञानामुळेच जग युद्धापासून दूर व शांततेच्या जवळ जाईल." ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

"जगापुढे, विशेषतः आशिया खंडापुढे आज दोनच मार्ग उपलब्ध आहेत. एक बुद्धाचा मार्ग व दुसरा मार्क्सचा मार्ग. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा वेळीच जगाने स्वीकार केला नाही तर कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाचा विजय होणे अपरिहार्य आहे. बुद्धाचे तत्त्वज्ञान हाच जगाला एकमेव आधार आहे व त्याचा जेवढा प्रचार होईल तेवढे जग युद्धापासून दूर व शांततेच्या नजीक जाईल."  ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.

दि. १५ फेब्रुवारी १९५३, नवी दिल्ली.
**********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)