प्रत्येक समाजात दोन वर्ग असतात, शासनकर्ता वर्ग आणि बहुजन समाज

शुक्रवार, दि. 22 सप्टेंबर 1944, मद्रास
"आपण सर्व राष्ट्रीय सरकारची अपेक्षा करीत आहोत आणि सर्वात मला जास्त काळजी वाटत असेल ती याची की, हे राष्ट्रीय सरकार आजच्या सरकारपेक्षा काही जास्त करणार आहे काय? याबद्दल मला थोडीशी शंका वाटते. आपण सर्व म्हणत आहोत की, एकदा आमच्या हातात सत्ता आली, वयात आलेल्या सर्व स्त्री-पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळाला की, सगळ्या दुःखाचा अंत होईल आणि सर्व काही व्यवस्थित होऊन प्रत्येक व्यक्ती माणूस म्हणून छाती पुढे काढून हमरस्त्यावरून फिरू लागेल! मला त्याबद्दल मोठी शंका वाटते. मी युरोपियन शासन पद्धतीचा व पार्लमेंटरी समाजव्यवस्थेचा पुरेसा अभ्यास केला आहे आणि सार्वत्रिक मतदान अंमलात येऊन पार्लमेंटरी पद्धतीचे सरकार स्थापन होताच सर्व मानवी दुःखाचा अंत होईल असे जे जे कधी कधी म्हणण्यात येते, त्यावर माझा काडीइतकाही विश्वास नाही. अशा समजुतीला इतिहासाचा काहीच आधार नाही. खरी गोष्ट अशी आहे की, सार्वजनिक मतदान असो की नसो, लोकमतानुवर्ती सरकार असो की दुसरे कसलेही सरकार असो, प्रत्येक समाजात दोन वर्ग असतात. शासनकर्ता वर्ग आणि बहुजन समाज. हे भेद स्पष्ट असोत की अस्पष्ट असोत, त्याला काही महत्त्व नाही. तुम्ही सार्वजनिक मतदान अंमलात आणा, शेवटी शासनकर्ता वर्ग अधिकारपदावर निवडून येणार! बहुजन समाजाला मात्र निवडून येण्याची कधीच आशा नाही. हे विधान मी बेजबाबदारपणे ठोकून देत नाही. त्याला इतिहाससिद्ध आधार आहेत.

1937 सालच्या निवडणुकांचा परिणाम काय झाला, पहा. मतदानाचा अधिकार अगदी व्यापक होता. निवडणुका अगदी जोरात लढविण्यात आल्या आणि मतेही अनिर्बंध देण्यात आली. शेवटी झाले काय? काॅंग्रेसच्या सात प्रांतात मी म्हटले तेच खरे ठरले. ते हे की या देशात तुम्ही काहीही केले तरी शासनकर्ती जमात ही ब्राह्मण जातच ठरणार! सात प्रांतात मुख्य प्रधान ब्राह्मण होते. मंत्रीमंडळात अर्धे लोक ब्राह्मणच होते. मी हे टीका म्हणून सांगत नाही. या प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टी आहेत. निवडणुकीवरून जर काही निश्चित झाले असेल तर ते हेच की या देशात शासनकर्ती जमात एकच आहे व तीच वर आली." ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आपला उद्धार करायला आपणच कंबर कसली पाहिजे

मुंबई- चिराबझार येथे 4 जून 1927 रोजी रात्री साडेआठ वाजता बहिष्कृत वर्गाची जंगी जाहीर सभा बहिष्कृत भारताचे संपादक डॉ. बी आर आंबेडकर, बार-ॲट-लॉ यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.
या सभेतील बाबासाहेबांच्या भाषणातून...

"आपला उद्धार करायला आपणच कंबर कसली पाहिजे. हे काम एका दोघांचे नाही. यात अनेक लोकांनी आपल्या छातीचा कोट करून आपली माणुसकी स्पृश्य लोकांपुढे सिद्ध करून घेतली पाहिजे. या कामात अनेकांचे बळी पडतील. आपल्या पूर्वजांनी रणांगणात आपल्या मनगटातील जोर समशेरीच्या तडाख्यांनी सिद्ध केलेला आहे. आता आपण आपल्या बुद्धिवैभवाने आजच्या सामाजिक दंगलीत आपली श्रेष्ठ जागा पटकाविली पाहिजे!" ~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

**********************************
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग १)
**********************************

आधी राजकीय मग सामाजिक ही मीमांसा नादानपणाची

बेळगांव जिल्ह्यातील निपाणी गावी "मुंबई इलाखा प्रांतिक बहिष्कृत परिषद: अधिवेशन तिसरे" या सभेतील बाबासाहेबांच्या भाषणातून. (दि. 11 एप्रिल 1925)
वैकम सत्याग्रहाच्या संदर्भाने बाबासाहेबांनी हे विचार मांडले:
"आधी राजकीय मग सामाजिक, ही मीमांसा अगदी नादानपणाची आहे, हे आता सिद्ध झाले आहे. कारण आज इतके दिवस नुसते राजकारण शिजत घातल्यानंतर जर राजकीय ध्येयाच्या आड कोणती बाब येत असेल तर ती सामाजिकच होय. सामाजिक प्रश्न इतका महत्त्वाचा आहे की, त्याला कितीही भिजत पडू दे म्हटले तरी तो प्रश्न दत्त म्हणून पुढे उभा राहतोच. ज्या राजकारणी धुरंधर पुरुषांनी सामाजिक प्रश्न बाजूस ठेवून नुसते राजकारण हाती घेतले व इतरांस घेण्यास लाविले त्यांनी काहीच साधले नाही. इतकेच नव्हे तर सामाजिक प्रश्न बाजूस टाकल्यामुळे त्यांच्या राजकीय ध्येयाची साध्यता त्यांची त्यांनीच बिकट करून टाकली. यास आजची परिस्थिती साक्ष देत आहे. तो सामाजिक प्रश्न त्यांनी वेळीच हाती घेतला असता तर आज सर्वत्र दिसून येत असलेली तेढ व दुही दृष्टीस पडती ना!" ~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 
 **********************************
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग १)
**********************************

Struggle and Sacrifice: The message

"My message to the downtrodden is, Struggle and more struggle. Sacrifice and more sacrifice. It is struggle and struggle alone without counting the sacrifices or sufferings that will bring their emancipation. Nothing else will."

~Dr. Babasaheb Ambedkar 

April 13, 1947

(DBAWS, Vol. 17, Part Two)

समाजजीवनात निरपेक्ष कर्तव्यबुद्धीने झटले पाहिजे

"आपला समाज आज सर्वतोपरी मागासलेला आहे. द्रव्याने मागासलेला आहे. मनोधैर्याने मागासलेला आहे. ज्या समाजातील लोकांस राजकीय, सामाजिक व धार्मिक असमता व अन्याय यापासून पराकाष्ठेचा त्रास होत आहे. ज्यातील सार्‍या लोकास गूढ अज्ञानाने व्यापिले आहे. ज्यास विपत्तिपासून होणाऱ्या यातना सोसाव्या लागत आहेत व त्याच्या परिहारार्थ काय करावे समजत नाही, त्या लोकांची सर्वत्र चाललेल्या जीवनकार्यात अखेर गती काय होईल हे सांगता येणे फार कठीण आहे. यासाठी आपल्यापैकी ज्यांना ही स्थिती स्पष्टपणे कळत असेल व ज्यांच्या मनात कर्तव्यबुद्धी व परोपकारबुद्धी पूर्णपणे जागृत झाली असेल, त्यांनी आपल्या समाजाचा जीवनार्थ कलहात टिकाव लागण्यासाठी रात्रंदिवस निरपेक्ष बुद्धीने झटले पाहिजे. अशा प्रकारचे विचार समजले असून ते जर स्वस्थ राहतील, तर त्यांच्या माथ्यावर आपल्या दडपून गेलेल्या बांधवास विपन्नावस्था आणिल्याची आणि त्यांचा नाश केल्याची भयंकर जबाबदारी येणार आहे. म्हणून सुशिक्षित बांधवहो! जर तुम्हाला इतरांकडून व पुढील संततीकडून बरे म्हणून घ्यावयाचे असेल व तुमची आज जी स्थिती आहे ती दूर करून तुमच्या मुलांची व नातवंडांची स्थिती अधिक वाईट होऊ नये अशी तुम्हास वास्तविक इच्छा असेल तर ज्या दुर्गतांनी व दुराचारांनी आपल्या लोकांच्या बुद्धीचा, कीर्तीचा व परिस्थितीचा घात चालविला आहे त्यांचे यथाशक्ती निर्मूलन करणे हे आपले कर्तव्य आहे व ते आपण केले पाहिजे." ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बार्शी, जिल्हा सोलापूर येथे भरलेल्या मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत मे 1924 मध्ये झालेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण. (ज्ञानप्रकाश, 24 मे 1924 व 7 जून 1924)

(खंड 18, भाग 1)

मनुष्याच्या मनुष्यत्वाला व माणुसकीला किंमत नाही तो धर्म काय कामाचा?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या "मुक्ती कोन पथे?" या ऐतिहासिक भाषणातून (13 ऑक्टोबर 1935, येवले, महाराष्ट्र)

"या असमानतेच्या अन्यायात सांत्वन करण्याच्या हेतूने काही स्पृश्य लोक अस्पृश्यांना सांगतात की तुम्ही शिक्षण घ्या, म्हणजे तुम्हाला शिवू! तुम्ही स्वच्छ रहा म्हणजे तुम्हाला शिवू! आणि समानतेने वागवू! खरे म्हटले असता, अडाणी महाराची, दरिद्री महाराची आणि अस्वच्छ महाराची जी गत होते तीच गत शिकलेल्या महाराची, पैसेवाल्या महारची आणि स्वच्छ राहणार्‍या महाराची होते. हे तुम्हा आम्हा सर्वांना अनुभवाने माहीत आहे. पण तो प्रश्न जरी बाजूला ठेवला तरी जर शिक्षण घेतल्याशिवाय, हाती पैसा असल्याशिवाय, अंगावर पोषाख असल्याशिवाय मानमान्यता मिळणार नाही, तर साध्या महाराने काय करावे? ज्याला शिक्षण प्राप्त होऊ शकत नाही, ज्याला पैसा मिळू शकत नाही आणि ज्याला नीटनेटका पोषाख करता येत नाही, त्या महाराला समानता कशी मिळणार? ख्रिस्ती धर्मात, मुसलमानी धर्मात जी समानतेची शिकवण देण्यात आली आहे तिचा संबंध विद्या, धन, पोषाख, पराक्रम अशा बाह्य वस्तूंशी मुळीच नाही. माणसाचे मनुष्यत्व हीच महत्त्वाची गोष्ट आहे, असे दोन्ही धर्म मानतात आणि ते मनुष्यत्व सर्वांना आदरणीय असले पाहिजे. कोणी कोणाचा अवमान करु नये व कोणी कोणाला असमान मानू नये, असे ते धर्म शिकवतात. हिंदू धर्मात या शिकवणीचा पूर्ण अभाव आहे. ज्या धर्मात मनुष्याच्या मनुष्यत्वाला व त्याच्या माणुसकीला काही किंमत नाही तो धर्म काय कामाचा? आणि त्याला कवटाळून धरून राहण्यात काय हशील आहे?" ~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

(खंड 18, भाग 1)

अन्यायाची जाणीव कशी होणार?

मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषणातून (मे 1924, बार्शी, जि. सोलापूर)

"अमुक एक गोष्ट (जातिभेदामुळे) करता येत नाही वगैरे आवेशयुक्त बोल ऐकून (आपल्या लोकांना) त्वेष येत नाही; याचे कारण त्यांना या अन्यायाची जाणीव होत नाही. मनुष्य एखाद्या हुद्द्यावर चढण्यास लायक असताना जर त्याला जातिभेदांमुळे तो हुद्दा प्राप्त होत नाही, तर तशा माणसाला जातीभेद कसा नडतो हे त्याला कळू लागेल व त्याला आपल्या चळवळीचे मार्ग कळून तो तिचा पुरस्कर्ता होईल. पण ज्याला त्या जागेवर जाण्याची लायकी नसेल, तर त्याला जातीभेदाचे उग्र स्वरूप कसे कळणार? जातीभेद असला काय आणि नसला काय, तो आहे तिथेच राहणार. म्हणून आपल्या लोकांची लायकी वाढण्याची आपण काळजी घेतली पाहिजे."

~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

(खंड 18, भाग 1)

आपल्या समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी काम करणार आहे

"मी आपल्या समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी म्हणून कसोशीने व प्रामाणिकपणे काम करणार आहे. त्यासाठी मी एवढा विद्याभ्यास केलेला आहे. मी मिळविलेल्या ज्ञानशक्तीचा उपयोग केवळ माझे कुटुंब व जात यांच्यासाठी करणार नाही. मी सर्व अस्पृश्य समाजाच्या चळवळीसाठी तिचा उपयोग करणार आहे. त्यासाठी मी अनेक योजना आखलेल्या आहेत. त्या सफल झाल्या तर अस्पृश्य समाज व स्पृश्य समाज यांचा फायदा होईल. अस्पृश्यांचे प्रश्न फार बिकट आहेत. ते सर्व मी सोडवू शकणार नाही याची मला जाणीव आहे. परंतु ते सर्व प्रश्न जगाच्या चव्हाट्यावर मांडून मी त्याकडे सर्व जगाचे लक्ष वेधू शकेन, एवढा मला आत्मविश्वास आहे. अस्पृश्यांची समस्या म्हणजे प्रचंड हिमालय आहे. या हिमालयाशी टकरा मारून मी माझे डोके फोडून घेणार आहे. हिमालय कोसळला नाही तरी माझे रक्तबंबाळ डोके पाहून सात कोटी अस्पृश्य लोक तो हिमालय जमीनदोस्त करण्यास एका पायावर तयार होतील व त्यासाठी प्राणार्पण करतील, हे तुम्ही पक्के ध्यानात ठेवा."

~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१९२४, मुंबई. बहिष्कृत हितकारिणी सभेच्या सक्रिय सभासदांना उद्देशून. आपापसात तेढ निर्माण होऊ देऊ नका, हे सांगताना...)