टीका करण्याचा हक्क कोणाचा?

बौद्ध धर्म स्वीकारण्याबद्दल सर्व वर्तमानपत्रात टीका केलेली असायची. त्याचा परामर्श घेताना बाबासाहेब म्हणतात:

"टीका करण्याचा हक्क कोणाचा? कोणी कोणावर टीका करायची? ज्याला सहानुभूती आहे, त्यालाच टीका करण्याचा अधिकार असतो. संरक्षण करणाऱ्यालाच टीका करण्याचा अधिकार आहे. जीव घेणाऱ्याला-मारणाऱ्याला टीका करण्याचा अधिकार नाही. ......म्हणून मला वर्तमानपत्रकर्त्यांना असे विचारावयाचे आहे की तुम्ही आमचे रक्षणकर्ते की आमचे विनाशकर्ते? तुम्ही आहात तरी कोण? हजारो वर्षे आम्ही तुमच्या समाजात वावरत आलो. कोणीतरी पुढे येऊन सांगावे की अस्पृश्यांसाठी ह्या गोष्टी केल्या. अस्पृश्यांच्या उद्धारासाठी ज्यांनी करंगळीसुद्धा वरती केली नाही त्यांना टीका करण्याचा काय अधिकार? ह्या लोकांना माझे असे सांगणे आहे की तुम्ही तोंड गप्प करून बसा. आम्हाला खड्ड्यात पडायचे असेल तर पडू. तुम्ही इतके दिवस आम्हाला खड्ड्यात टाकलं. आता ते स्वातंत्र्य आम्हाला द्या. पडण्याचा अधिकार, चुका करण्याचा अधिकार आम्हाला द्या. तुम्ही कोणत्याही प्रकारची मदत दिली नाही. तुम्ही अस्पृश्यांच्या पोरांना विलायतेला पाठविलं आहे काय? त्यांना ह्या ज्या स्कॉलरशिप्स मिळत आहेत त्या मी मिळविल्या आहेत. आम्ही आमच्या पायावर उभे राहू." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.


दि. ८ मे १९५५, मुंबई, नरे पार्क येथे बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणातून.
**********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)

मी नदीच्या प्रवाहालाच वळविणाऱ्या भक्कम खडकासारखा

"केंद्रीय सरकारात १९४७ साली मी सामील झालो. मी काँग्रेसला मिळालो अशी टीका माझ्या काही टीकाकारांनी माझ्यावर केली. माझ्या टीकाकारांनी केलेल्या निंदेला मी लखनौच्या भाषणात उत्तर दिले आहे. त्या भाषणात माझ्या देशबांधवांना मी सांगितले की पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाणाऱ्या मातीच्या ढेकळाप्रमाणे मी भुसभुशीत नसून मी पाण्यात न विरघळता नदीच्या प्रवाहालाच वळविणाऱ्या एखाद्या भक्कम खडकासारखा आहे. मी कोठेही असलो किंवा कुणाच्याही संगतीत मी राहिलो तरी माझे स्वतःचे वैशिष्ट्य मी कधीही गमावणार नाही. एखाद्या चांगल्या कामासाठी जर कोणी माझ्या सहकार्यासाठी विचारणा केली तर मी आनंदाने सहकार्य करीन. मागील चार वर्षेपर्यंत काँग्रेस सरकारशी मी माझ्या सर्व सामर्थ्यानिशी प्रामाणिकपणे माझ्या मातृभूमीची सेवा करण्यात सहकार्य केले. परंतु या संपूर्ण काळाच्या दरम्यान काँग्रेस संघटनेत मी विरून जाण्यापासून स्वतःला अलिप्त राखले आहे. जे लोक आपल्या शब्दाशी व कर्तृत्वाशी प्रामाणिक राहून अस्पृश्यांच्या कार्यात मदत करू इच्छितात त्यांच्याशी मी आनंदाने सहकार्य करून त्यांना मदत करेन. जे केवळ गोडबोले व गोड गोड थापा मारणारे आहेत परंतु ज्यांचा अंतस्थ हेतू आणि कृती आमच्या लोकांच्या हिताच्या विरोधी असते त्यांना मी कदापिही मदत करणार नाही." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.

दि. २७ ऑक्टोबर १९५१, जालंदर येथे पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी केलेल्या भाषणातून.
**********************************
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३)

धर्मास ग्लानी का येते?

"मिलिंदाने असा प्रश्न विचारला की धर्मास ग्लानी का येते? नागसेनाने त्याचे उत्तर देऊन त्याची तीन कारणे सांगितली-
पहिले कारण हे की एखादा धर्मच कच्चा असतो. त्या धर्माच्या मूळ तत्त्वांत गांभीर्य नसते. तो कालिक धर्म बनतो व काळापुरता अशा धर्म टिकतो.

दुसरे कारण हे की धर्म प्रचार करणारे विद्वान लोक नसतील तर धर्म ग्लानी होते. ज्ञानी माणसांनी धर्मज्ञान सांगितले पाहिजे. विरोधकांशी वादविवाद करण्यास धर्माचे प्रचारक सिद्ध नसतील तर धर्माला ग्लानी येते.

आणि तिसरे कारण हे की धर्म व धर्माची तत्त्वे विद्वानांसाठी असतात. प्राकृत व सामान्य लोकांकरिता मंदिरे-देवळे असतात. ते तेथे जाऊन आपल्या श्रेष्ठ विभूतीचे पूजन करतात.

आपण बौद्ध धर्म स्विकारतांना ही कारणे लक्षात ठेवली पाहिजे. बौद्ध धर्माची तत्त्वे कालिक, काही काळापुरती आहेत असे कोणासही म्हणता यावयाचे नाही. आज अडीच हजार वर्षांनंतरही बुद्धांची सारी तत्त्वे सर्व जग मानते. अमेरिकेमध्ये बुद्धाच्या दोन हजार संस्था आहेत. इंग्लंडमध्ये तीन लाख रुपये खर्च करून बौद्ध मंदिर बांधण्यात आले आहे. जर्मनीतही तीन-चार हजार बुद्ध संस्था आहेत. बुद्धाची तत्वे अजरामर आहेत. तथापि बुद्धांनी असा दावा केला नाही की हा धर्म ईश्वराचा आहे. बुद्धांनी सांगितले माझे वडील प्राकृत होते; माझी आई प्राकृत बाई होती. हा धर्म तुम्हाला वाटेल तर घ्यावा. हा धर्म जेव्हा तुमच्या बुद्धीला पटेल तेव्हा तो तुम्ही स्वीकारा. एवढी उदारता दुसऱ्या कोणत्याही धर्मात सांगितलेली नाही." ~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.

दि. १५ ऑक्टोबर १९५६, नागपूर. धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यातील भाषणातून.