सर्वसाधारण जागेवर अस्पृश्य उमेदवार उभा करून कॉंग्रेसने आपला प्रांजळपणा सिद्ध करावा

 *"अस्पृश्य लोकांसंबंधीचा कॉंग्रेसचा हेतू प्रांजळ असेल तर ते सर्वसाधारण जागेवर अस्पृश्य उमेदवार उभा करून आपला प्रांजळपणा सिद्ध का करीत नाहीत?" ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
*********
ता. २७ ऑक्टोबर १९५१, जालंदर.
*****
"विभाजनानंतर पाकिस्तान सरकारने अस्पृश्यांना पाकिस्तानातून भारतात येण्यावर बंदी घालणारे एक फर्मान काढले. कितीही हिंदूंनी पाकिस्तान सोडले तरी पाक सरकारने त्यांची पर्वा केली नाही; परंतु अस्पृश्यांनी पाकिस्तान सोडले तर मैला वाहण्याचे, सडका झाडण्याचे, मेलेली जनावरे उचलण्याचे तिरस्करणीय जातीचे घाणेरडे धंदे कोण करणार होते? मी पं. नेहरूंना विनंती केली की या लोकांच्या स्थलांतर करण्यावर बंदी घालणारा हा आदेश काढून घेण्यासंबंधी काहीतरी कारवाई करा. परंतु त्यांनी काहीही केले नाही. या समस्येसंबंधी ते झोपी गेले आणि पाकिस्तानशी ज्या काही चर्चा वेळोवेळी झाल्या त्यावेळी त्यांनी या प्रश्नाचा प्रासंगिक उल्लेखही केला नाही. एकाकीपणे जेवढे मला करता येणे शक्य होते तेवढे मी केले आहे. महार बटालियनच्या शूर शिपायांनी गंभीर धोका पत्करून मला मदत केली आणि पाकिस्तानातून अनेक अस्पृश्य लोकांना आणले.

अशा स्थितीत आम्ही काँग्रेस पुढाऱ्यांच्या आश्वासनावर विश्वास कसा ठेवावा? अस्पृश्य लोकांसंबंधीचा कॉंग्रेसचा हेतू प्रांजळ असेल तर ते सर्वसाधारण जागेवर अस्पृश्य उमेदवार उभा करून आपला प्रांजळपणा सिद्ध का करीत नाहीत?" ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

********
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग ३, पान क्र. २५१)
********