युवक कसे असावेत

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनमाड येथे युवकांना मार्गदर्शनपर केलेलं भाषण :~
बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणतात, "मनुष्याने आपल्या आयुष्यात खाणे-पिणे व जगणे ही आयुष्यातील इतिकर्तव्यता मानता कामा नये. खाणे-पिणे हे जगण्याकरीता असावे व जगणे हे मानमरातबाचे व समाजास भूषणभूत होण्यासाठी समाजसेवेचे असावे. "खायला काळ व भुईला भार" असे जगणे असले काय नि नसले काय सारखेच."
ते पुढे म्हणाले, "तरुणांनी नेहमी आपल्यापुढे उदात्त ध्येय ठेवले पाहिजे. तरुणांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की, कोणतीही चांगली गोष्ट संपादन करण्यासाठी तप करावे लागते. म्हणूनच आपल्यात एक म्हण रूढ आहे की, 'तपा अंती फळ.' कार्य आत्मोन्नतीचे असो वा राष्ट्रोन्नतीचे असो; कशाचेही का असेना त्यासाठी सतत प्रयत्न करावयास हवे आहेत. माणसाने त्या कार्यास स्वतःस वाहून घेतले पाहिजे. मी अनेक अर्वाचीन तरुण पाहिले आहेत की, जे १५ मिनिटे टेबलावर सतत बसू शकत नाहीत, त्यांना घटकोघटकी विडी ओढावी लागते, चहा प्यावा लागतो, त्याशिवाय त्यांना कामच करता येत नाही. हे योग्य नाही. कोणीही इसम आपल्या उपजत बुद्धीवर पराक्रम करू शकत नाही. जगात खुळी माणसे फारच थोडी निपजतात. तसेच बुद्धीचा विकास करणे ही दरेकाच्या हातची गोष्ट आहे. २४ तासापैकी २० तास सतत टेबलावर बसून काम करता आले पाहिजे. मी माझ्या विद्यार्थी दशेत येथे व परदेशातही सतत २० तास टेबलावर बसून काम केले आहे. ज्या कोणास आपल्या बुद्धीचा प्रभाव वाढवावयाचा आहे त्यांनी तप केले पाहिजे. श्रम केले पाहिजेत."
"मनुष्य संकटात अगर दारिद्र्यात सापडला म्हणजे तो निराश होत असतो. आपणास यश मिळणार नाही अशी भावना त्याच्या मनात उत्पन्न होते. जर का या भावनेने मनुष्यास घेरले म्हणजे तो मनुष्य आयुष्यात कुचकामाचा ठरतो. हरेक तरुणाने आशा कधीच सोडू नये. ज्या दिवशी तो आशा सोडील त्या दिवशीच तो जगात जगला काय आणि मेला काय सारखाच होईल. हरेक तरुणात महत्वाकांक्षा असली पाहिजे. महत्वाकांक्षेशिवाय मनुष्य धडपड व प्रयत्न करूच शकत नाही. यासाठी अस्पृश्य मानलेल्या तरुणांमध्ये महत्वाकांक्षेचे बीज प्रथम रुजले पाहिजे. सर्व परिस्थितीवरुन निराश होणे स्वाभाविक असले तरी आज आपण निराश न होता मनात उच्च महत्त्वाकांक्षा धरून त्या दृष्टीने प्रयत्नांची शिकस्त करावयास हवी आहे."
"आज विद्येची द्वारे आपणास मोकळी आहेत. आज शिक्षणाच्या ज्या सोयी आहेत त्या आमच्या वेळी मुळीच नव्हत्या. आम्हास त्या काळी कोणाचीच मदत नव्हती. मी विश्वविद्यालयात असता माझे वडील व कुटुंबातील मंडळी, एक बकरी, सरपण, चूल, इ. सर्व सामान असे ८ बाय ८ च्या लांबी रुंदीच्या खोलीत राहून मला काॅलेजचा अभ्यास करावा लागत असे. ती स्थिती आज बदललेली आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने सुविद्द्य व्हावे अशी माझी फार इच्छा आहे. परंतु त्याचबरोबर आज विद्येची मला मोठी भिती वाटते. शिकलेल्या लोकांची तशी सर्वांनी भिती बाळगली पाहिजे. कारण शिक्षण ही तलवार आहे. शिक्षण हे शस्त्र आहे. जर एखादा मनुष्य येथे तलवार घेऊन आला तर आपण सर्व जण त्यास घाबरून जाल. परंतु विद्येचे शस्त्र हे नेहमी वापरणाऱ्यावर अवलंबून असते. हत्याराने अबलांचे संरक्षण मनुष्य करू शकेल. चांगल्या माणसाच्या हातात शस्त्र असणे उत्तम; परंतु वाईट माणसाच्या हातात शस्त्र असणे बरे नाही. शिक्षण घेतलेल्या माणसाच्या अंगी शील व सौजन्य नसेल तर तो हिंस्त्र पशूपेक्षाही क्रूर व भितीप्रद समजण्यात यावा. अज्ञ जनतेस छक्केपंजे, डावपेच करता येत नाहीत. शिकल्यासवरलेल्यांना ते अवगत असतात. दीनदुबळ्या, गरीब शेतकऱ्यांना शिक्षण नाही. त्यांच्या अज्ञानीपणाचा फायदा शिकले-सवरलेले शेठजी, भटजी, वकील वगैरे सर्व लोक घेतात. अशा तऱ्हेने गरीब जनतेस नाडण्याकडेच जर या शिक्षणाचा उपयोग होणार असेल तर धिःकार असो अशा शिक्षणाला. त्या दृष्टीने पाहता शील फार महत्त्वाचे आहे. अलीकडे तरुणांत धर्माबद्दल औदासिन्य दिसते. परंतु माझ्यात ज्या काही चांगल्या गोष्टी असतील व माझ्या शिक्षणाचा जो काही जनतेसाठी उपयोग झाला असेल तो सर्व माझ्यात असलेल्या धार्मिक भावनेमुळेच होय. मला धर्म हवा आहे; परंतु धर्माचे ढोंग नको. तेव्हा शीलाला अधिक महत्त्व द्या. तसेच, आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्याच दीनदुबळ्या जनतेच्या उद्धारार्थ न करता जर शिकून आपली नोकरी भली आणि आपली बायका-मुले भली या भावनेने आजचे शिकलेले तरुण वागणार असतील तर त्यांचा समाजाला काय उपयोग? तरुणांवर आज पडलेली जबाबदारी ओळखून कार्यास लागावयास हवे. जनतेच्या अंगी भित्रेपणा दिसतो. आपले कायदेशीर हक्क बजावण्यासाठीसुद्धा ते धैर्याने पुढे येऊ शकत नाहीत. ही परिस्थिती फक्त तरुणच बदलू शकतील. त्यासाठी प्रथम कंबर कसली पाहिजे."
(अंशतः)

संदर्भ :~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि  भाषणे
#डॉबाबासाहेब #आंबेडकर
#विचार #भाषण  #युवा

तुमच्या निर्णयावर भितीचा किंवा उपकाराचा परिणाम होऊ देऊ नका

"एकदा एका चिनी शिंप्याकडे नवीन कोट शिवावयास टाकला होता व नमुन्यासाठी म्हणून त्याला जुना कोट दाखविला. तेव्हा त्याने मोठ्या गर्वाने त्या नमुन्याबरहुकूम ठिगळे, चिरा इत्यादी सर्वासह नवीन कोट शिवून दिला. ब्रिटिशांच्या काळात तुमच्या समाजरचनेतील दोषांची छिद्रे व वर्णव्यवस्थेची ठिगळे त्यांनी दुरुस्त न करता जशीच्या तशीच ठेवली. आणि याहीपुढे जाऊन मी तर असे म्हणेन की, इंग्रजांच्या सर्व शक्तीचा व तत्त्वांचा विचार करता तुमच्या तक्रारी निवारण करण्याची व येथील समाजरचनेत बदल घडवून आणण्याची लायकीच ब्रिटिशांजवळ नाही. आणि जोपर्यंत तुमच्या हातात शासनसत्ता येत नाही तोपर्यंत तुम्ही या तुमच्या दुःखाचे निवारण करु शकत नाही. आणि जोपर्यंत ब्रिटिशांचे राज्य येथे आहे तसेच कायम राहील तोपर्यंत तुमच्या हातात शासनसत्तेचा वाटा येऊ शकत नाही, तर स्वराज्याच्या घटनेमध्येच तुमच्या हातात शासनसत्तेचा काही वाटा मिळण्याची शक्यता असून त्यावाचून तुम्ही तुमच्या लोकांना मुक्ती मिळवून देऊ शकत नाही. आपल्या देशातील बहुसंख्य लोकांच्या हातातील स्वराज्य म्हणजे भुतांचा बाजार आहे, हेही मला माहीत आहे... दलित वर्गावर आमच्या देशातील लोकांनी जे अन्याय, अत्याचार व जुलूमजबरदस्ती केली त्याची मला आठवण आहे आणि भावी स्वराज्यात असेच जुलूम या लोकांवर होतील की काय अशीही मला भिती वाटते. परंतु सद्गृहस्थांनो! काही क्षणासाठी तुम्ही जर भूतकाळ विसरण्याचा प्रयत्न केला आणि भावी स्वराज्यातील काही वर्गापासून सर्वसामान्य जनतेचे संरक्षण करणाऱ्या घटनादत्त संरक्षण तरतुदींचा तुम्ही विचार केला तर भावी स्वराज्य हा भूतांचा बाजार ठरण्याऐवजी तुमच्या हातात सत्ता येण्याची शक्यता तुम्हाला दिसून येईल आणि इतरांबरोबर तुम्हीही या देशाचे सार्वभौम राज्यकर्ते व्हाल. भूतकाळाचे भूत तुमच्यावर स्वार होऊ देऊ नये. तुमच्या निर्णयावर कोणत्याही भितीचा किंवा उपकाराचा परिणाम होऊ देऊ नका."
~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
8 ऑगस्ट 1930
**********************************
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे; खंड १८, भाग १)
**********************************