डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनमाड येथे युवकांना मार्गदर्शनपर केलेलं भाषण :~
बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणतात, "मनुष्याने आपल्या आयुष्यात खाणे-पिणे व जगणे ही आयुष्यातील इतिकर्तव्यता मानता कामा नये. खाणे-पिणे हे जगण्याकरीता असावे व जगणे हे मानमरातबाचे व समाजास भूषणभूत होण्यासाठी समाजसेवेचे असावे. "खायला काळ व भुईला भार" असे जगणे असले काय नि नसले काय सारखेच."
ते पुढे म्हणाले, "तरुणांनी नेहमी आपल्यापुढे उदात्त ध्येय ठेवले पाहिजे. तरुणांनी एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की, कोणतीही चांगली गोष्ट संपादन करण्यासाठी तप करावे लागते. म्हणूनच आपल्यात एक म्हण रूढ आहे की, 'तपा अंती फळ.' कार्य आत्मोन्नतीचे असो वा राष्ट्रोन्नतीचे असो; कशाचेही का असेना त्यासाठी सतत प्रयत्न करावयास हवे आहेत. माणसाने त्या कार्यास स्वतःस वाहून घेतले पाहिजे. मी अनेक अर्वाचीन तरुण पाहिले आहेत की, जे १५ मिनिटे टेबलावर सतत बसू शकत नाहीत, त्यांना घटकोघटकी विडी ओढावी लागते, चहा प्यावा लागतो, त्याशिवाय त्यांना कामच करता येत नाही. हे योग्य नाही. कोणीही इसम आपल्या उपजत बुद्धीवर पराक्रम करू शकत नाही. जगात खुळी माणसे फारच थोडी निपजतात. तसेच बुद्धीचा विकास करणे ही दरेकाच्या हातची गोष्ट आहे. २४ तासापैकी २० तास सतत टेबलावर बसून काम करता आले पाहिजे. मी माझ्या विद्यार्थी दशेत येथे व परदेशातही सतत २० तास टेबलावर बसून काम केले आहे. ज्या कोणास आपल्या बुद्धीचा प्रभाव वाढवावयाचा आहे त्यांनी तप केले पाहिजे. श्रम केले पाहिजेत."
"मनुष्य संकटात अगर दारिद्र्यात सापडला म्हणजे तो निराश होत असतो. आपणास यश मिळणार नाही अशी भावना त्याच्या मनात उत्पन्न होते. जर का या भावनेने मनुष्यास घेरले म्हणजे तो मनुष्य आयुष्यात कुचकामाचा ठरतो. हरेक तरुणाने आशा कधीच सोडू नये. ज्या दिवशी तो आशा सोडील त्या दिवशीच तो जगात जगला काय आणि मेला काय सारखाच होईल. हरेक तरुणात महत्वाकांक्षा असली पाहिजे. महत्वाकांक्षेशिवाय मनुष्य धडपड व प्रयत्न करूच शकत नाही. यासाठी अस्पृश्य मानलेल्या तरुणांमध्ये महत्वाकांक्षेचे बीज प्रथम रुजले पाहिजे. सर्व परिस्थितीवरुन निराश होणे स्वाभाविक असले तरी आज आपण निराश न होता मनात उच्च महत्त्वाकांक्षा धरून त्या दृष्टीने प्रयत्नांची शिकस्त करावयास हवी आहे."
"आज विद्येची द्वारे आपणास मोकळी आहेत. आज शिक्षणाच्या ज्या सोयी आहेत त्या आमच्या वेळी मुळीच नव्हत्या. आम्हास त्या काळी कोणाचीच मदत नव्हती. मी विश्वविद्यालयात असता माझे वडील व कुटुंबातील मंडळी, एक बकरी, सरपण, चूल, इ. सर्व सामान असे ८ बाय ८ च्या लांबी रुंदीच्या खोलीत राहून मला काॅलेजचा अभ्यास करावा लागत असे. ती स्थिती आज बदललेली आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने सुविद्द्य व्हावे अशी माझी फार इच्छा आहे. परंतु त्याचबरोबर आज विद्येची मला मोठी भिती वाटते. शिकलेल्या लोकांची तशी सर्वांनी भिती बाळगली पाहिजे. कारण शिक्षण ही तलवार आहे. शिक्षण हे शस्त्र आहे. जर एखादा मनुष्य येथे तलवार घेऊन आला तर आपण सर्व जण त्यास घाबरून जाल. परंतु विद्येचे शस्त्र हे नेहमी वापरणाऱ्यावर अवलंबून असते. हत्याराने अबलांचे संरक्षण मनुष्य करू शकेल. चांगल्या माणसाच्या हातात शस्त्र असणे उत्तम; परंतु वाईट माणसाच्या हातात शस्त्र असणे बरे नाही. शिक्षण घेतलेल्या माणसाच्या अंगी शील व सौजन्य नसेल तर तो हिंस्त्र पशूपेक्षाही क्रूर व भितीप्रद समजण्यात यावा. अज्ञ जनतेस छक्केपंजे, डावपेच करता येत नाहीत. शिकल्यासवरलेल्यांना ते अवगत असतात. दीनदुबळ्या, गरीब शेतकऱ्यांना शिक्षण नाही. त्यांच्या अज्ञानीपणाचा फायदा शिकले-सवरलेले शेठजी, भटजी, वकील वगैरे सर्व लोक घेतात. अशा तऱ्हेने गरीब जनतेस नाडण्याकडेच जर या शिक्षणाचा उपयोग होणार असेल तर धिःकार असो अशा शिक्षणाला. त्या दृष्टीने पाहता शील फार महत्त्वाचे आहे. अलीकडे तरुणांत धर्माबद्दल औदासिन्य दिसते. परंतु माझ्यात ज्या काही चांगल्या गोष्टी असतील व माझ्या शिक्षणाचा जो काही जनतेसाठी उपयोग झाला असेल तो सर्व माझ्यात असलेल्या धार्मिक भावनेमुळेच होय. मला धर्म हवा आहे; परंतु धर्माचे ढोंग नको. तेव्हा शीलाला अधिक महत्त्व द्या. तसेच, आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्याच दीनदुबळ्या जनतेच्या उद्धारार्थ न करता जर शिकून आपली नोकरी भली आणि आपली बायका-मुले भली या भावनेने आजचे शिकलेले तरुण वागणार असतील तर त्यांचा समाजाला काय उपयोग? तरुणांवर आज पडलेली जबाबदारी ओळखून कार्यास लागावयास हवे. जनतेच्या अंगी भित्रेपणा दिसतो. आपले कायदेशीर हक्क बजावण्यासाठीसुद्धा ते धैर्याने पुढे येऊ शकत नाहीत. ही परिस्थिती फक्त तरुणच बदलू शकतील. त्यासाठी प्रथम कंबर कसली पाहिजे."
(अंशतः)
संदर्भ :~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
#डॉबाबासाहेब #आंबेडकर
#विचार #भाषण #युवा